Saturday, December 31, 2011

सुभाषित .......2..!!

 विचारोनी बोले विवंचोनी चाले 
 तयाचेनि संतप्त तेही निवाले 
 तयाचे पुढे शोक संताप कैंचा 
 जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा !!.....समर्थ रामदास स्वामी !!




या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी !!!

 अर्थात "सर्व प्राणी जेंव्हा रात्री निद्रिस्त होतात तेंव्हा संयमी [योगी]जागा असतो.."याला आध्यात्मिक अर्थ मोठा आहे ...असो..


भगवंताने ५००० वर्षांपूर्वी हे सांगितले तेंव्हा ३१ डिसेंबर च्या पार्ट्या होत नव्हत्या ....नाहीतर भगवंत म्हणाले असते...

या "निशा" सर्व भूतानां ;तस्यां जागर्ति मद्यपी !!

सुभाषित ......!!

आघ्रातम परीचुम्बितम ननु मुहूरलिढम
ततः चर्वितम..!!
त्यक्तं वा भुवि नीरसेन मनसा ..तत्रं व्यथा मा
कृता!!
हे सद्रत्न ,तवैतदेव कुशलं ;यद्वानरेणाsदरात 
अन्तःसारविलोकीन व्यसनीना चूर्णीकृतं नाश्मना:!!


हे सुंदर रत्ना ;एका माकडाने तुला उचलून हुंगले ;चोखून किंवा चावून बघितले आणि जमिनीवर फेकून दिले यामध्ये वाईट वाटून घेऊ नकोस [ शेवटी ते माकड आहे !!]...उलट प्रत्येक गोष्टीत आत काय दडवले आहे अशी उत्सुकता असणार्या माकडाने तुझ्या आत काय आहे या उत्सुकतेपोटी तुला फोडून नाही पाहिले यात स्वताला भाग्यवान समज..........[नाहीतर तुझे अस्तित्वच संपले असते ].!!


   

Thursday, December 22, 2011

देवाचा अनुभव ............!!!!

आनंद आहे......जे जे हवे ते ते अवचित मिळते ...आणि विचार करून डोके थकून गेल्यावर जे विचार केलेही नसतील त्या मार्गाने मिळते हा एक थक्क करणारा अनुभव परत गाठीशी बांधला गेलाय..........

छान आहे.........अजब माया देवा तुझी !! 

सगळे प्रयत्न आणि तर्क संपल्यावर देवाच्या साम्राज्याची हद्द सुरु होते असे म्हणतात............भले मोठे माजलेले गर्व जिथे सटकन उतरून जातात अशी ही देवाची साम्राज्य सीमा...

खरच अफाट आहे सगळे.......शौर्य ;धैर्य आणि समाधान सगळेच देव देतो ......सगळेच देवाचे आहे........

उपनिषदात म्हंटले आहे ...
"त्वमेव सृष्ट्वा त्वदेव प्राविश्यत!!"
 अर्थात तूच सगळे निर्माण केलेस आणि तूच त्यांच्यात प्रवेश करून त्यांना व्यापून बसलास.............

निर्मिती आणि निर्माण करणारा एकच आहे....निर्मिती जी असते त्यांच्या क्रिया निर्मिकाच्याच क्रिया असतात..........जबरदस्त सत्य आहे हे ..सगळ्यात मोठ्ठा चमत्कार आहे हा !!!

अनुभव घ्या अनुभव घ्या ....काल तेच सांगण्यासाठी वाहतोय....सत्य समजले कि मुक्तता येते!!!......................


खरच ..""जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ".........देवत्व असेच आहे असे वाटते !!!


 
=========================लेखन -----हर्षल-------------

Monday, December 12, 2011

प्रेमांगीनी !!............old .classic style poem!!


हास्य तुझे कि;तुषार गंगेतील शुद्धसार?
रूप तुझे; जलवंती लाटांचे गर्वभार !!


मौक्तिके विशेष धुंद ऐसे तव अश्रू स्पंद !!
कलिका नवजात कुंद ऐसे तव वृत्ती छंद !!


लाघव सौहार्द तुझे कनकासम ये झळकून..
प्रेम तुझे नीलवर्ण जलधीसम ये भरून ..!!


रात्रींच्या विवरांतून अंधकार ओलांडून 
धावतात रवि-शर जे तेज नवे आश्वासून ..!!
ये तशीच प्रियवदने ;विश्व सर्व उल्लंघून..
प्रेम ज्योत स्निग्ध तुझ्या अंतरात चेतवून ...!!







.............लेखन -हर्षल.------------------------------
[जुन्या लेखन पद्धतीप्रमाणे रचलेली एक कविता ].......[काही कडवी लिहिलेली नाहीत !!]...

Sunday, December 11, 2011

.!!..संध्याकाळ ..!!

संध्याकाळ होते.........आणि शांत आकाशात उगाच काहूर उठल्या सारखे पक्षी पसरतात..

गर्दिंचे पूर वाहतात रेल्वे स्थानकांवरून....

सूर्य पार बुडालेला असतो...आणि त्याचे भगवे उत्तरीय मेघांच्या दाटीत अलगद अडकून पडते..ते सोडवताच अंधाराचे निळेशार पडदे
झाकून घेतात आकाश अगदी घट्ट............

मी शांतपणे चालत असतो ..गर्दीमधून एकटेपणाने ....कर्कश्श आवाजात बहिरेपणाने;अफाट बोलणार्या माणसांमधून मुकेपणाने ...

बाजार तुडुंब भरलेले असतात ...विजांच्या दिव्यांनी चकाकत असतात ...लोक खरेदी करत असतात; घरी पळत असतात ;जागोजागी चहा पीत असतात ;खात असतात ....अगडबंब जत्रा नुसती सगळीकडे ..आणि हे रोजचेच आहे...प्रत्येक संध्याकाळ गर्दीची;माणसांची आणि चीत्त्यासारखी वेगवान ..!!!

मी गर्दीत बोलत नाही....पाहत जातो..!!...एकट्याने चालत जातो..!!
मनात प्रश्न येतात अनेक त्यांना उगाच टाळत जातो....
अनेक न सुटलेली गणिते नेमकी संध्याकाळीच का आठवतात कुणास ठाऊक??
मी असाच संध्याकाळ बघायला सरावलोय..!!..तिला अर्थ नाही आणि स्वार्थ सुद्धा नाही...किमान माझ्यासाठी तरी..!!

आणि अवचित कुणी भेटते ओळखीतले..किंवा असेच कधी छेडले जातात हृदयाचे झंकार...आणि माझा अबोलपणा मोडून पडतो एखाद्या संध्याकाळी..अगदी वादळाने उखडलेल्या वृक्षासारखा  ;माझ्यापाशीच !!

उगाच वाटून जाते की,बरेच हरवून गेले...बरेच काही मिळाले ...पण नक्की हिशेब लागतच नाहीये ...!! 
बराच काळ सरला पण निरुत्तरित प्रश्न अजून तसेच...काही बंध निर्माण होण्या आधीच तुटून गेले कि काय ,काही अगदी अबोध पण निस्सीम प्रेमाचे नाते हरवून गेले कि काय..!!

काही गोष्टी जमल्याच नाहीत ...काही तारा जुळल्याच नाहीत ...अगदी आपल्यासाठी हवी होती अशी एक प्रेमळ हाक अजूनसुद्धा परकीच राहिली....आणि आपण वाट बघतोय त्या आवाजाची ...त्या होकाराची ..त्या कधीच  न जुळलेल्या नात्याची .... 
........!!

.......मग मी स्वतालाच सांगतो...त्याच अशांत संध्याकाळी, घरी परत जाताना... गच्च गर्दीत घुसमटलेल्या रेल्वेतल्या माझ्या अवघडलेल्या देहातील खिन्न मनाला ..मी म्हणतो 
"जाऊ देत मित्रा;
सगळीच कोडी सुटत नसतात;सगळेच बंध जुळत नसतात ;मनाला जसे हवे तसे सगळेच फासे पडत नसतात....""

.....गर्दीबरोबर मी स्वतःला शांत करत रेल्वेतून उतरतो..घर गाठायला परत रस्त्यावरच्या गर्दीत मिसळतो..चालत जातो.....!!


..संध्याकाळ बाहेर आजूबाजूला पसरलेली असते..आणि मनात विनाकारण अंधार दाटून आलेला असतो..त्यात माझे मन मलाच दिसत नाही;ईतके बुडून गेलेले असते..!!.......उगाचच!!



-----------------==लेखन -- हर्षल...........

[काल्पनिक ]

Sunday, December 4, 2011

स्वप्ने...!!!


स्वप्नांची उद्दाम कलेवरे नाचतात जेंव्हा
डोळ्यांच्या लहानशा विश्वात ..
जड होतात पापण्या आणि असह्य होतात 
आशांचे आघात ..!!!


स्वप्ने किती मोठी किती विशाल !!
आणि किती लहान शबल आपले कपाल..!!
स्वप्ने जाणत नाहीत नियतीची भेसूर बंधने ..
जाणत नाहीत देहाचे बद्ध कोश...
आणि मद्यमत्त असुरान्सारखी बेहोष होऊन गिरक्या घेतात ..
हृदयाच्या संकुचित धरणीवरती ...!!


स्वप्नांची राज्ये मोठी असतात ..
अवाढव्य असतात त्यांचे संभार ...
राक्षसी असतात त्यांचे आशावाद ...
माणसाचे शरीर पोखरून टाकतात ते..
आणि कोलमडून जाते स्वप्नाच्या ताणाखाली ..
आयुष्याचे सुंदर स्वरूप...


आयुष्ये कित्येक मालवून जातात ..
आणि स्वप्ने मात्र तशीच ...अथांग..उद्दाम..
एका देहावरून दुसर्या देहावर स्वार होतात ..
आत्म्यांसारखी.....!!!


.................लेखन --- हर्षल..!!