Monday, November 18, 2019

*** माकड आणि माणूस ***


डार्विन चा मनुष्य उत्पत्तिचा सिद्धांत अर्धवट आहे किंवा अपूर्ण आहे असे मान्य करूनही काही प्रश्न उरतातच !! त्यामुळे डार्विनच्या सिद्धांतालाच बळकटी येते की काय अशी शंका आम्हास वाटते !!

काही माणसे माकडापेक्षाही विचित्र वागतात .... आणि काही माकडछापच असतात !! काही माणसांना माकडासारखी वागणारी माणसे(?)आवडतात ..तर काही माणसे माकडछाप माणसांवर नुसता विश्वासच नव्हे तर जीव सुद्धा लावतात !! माकडालाही लाज वाटेल इतक्या मूर्खपणे काही माणसे (?)स्वतःचे आयुष्य कुठल्यातरी मूर्ख आवडीपायी वाया घालवतात ... आणि कुणी स्वत: सुज्ञ आणि शहाणे असूनही एखाद्या माकडाहून माकड असणाऱ्या वेडपटावर विश्वास टाकून स्वत:ची धूळधाण उडवून घेतात !! .....

या सगळ्यावरून ... माणसाचा पूर्वज माकड नव्हताच असे नक्की म्हणता येइल काय ? किंबहुना असे म्हणता येईल की ,काही माणसांचा पूर्वज नक्की डार्विनने म्हण्टल्या प्रमाणे खरोखरच "माकड" असावा !!

माणसाला एखादे उत्तम रत्न सापडले तर त्याची किम्मत त्याला समजते ....तो त्यास जपून ठेवतो ! तेच रत्न  जर माकडाला सापडले तर तो त्या रत्नाला चावून ..वास घेउन आणि अखेर फोडूनही पाहतो आणि काहीच सापडत नाही म्हणून शेवटी मातीत फेकून देतो !! .....फरक इथेच आहे ... माणसात आणि माकडात !!

" देवाने उत्तम बुद्धी व निर्णय घेण्याची शक्ती दिलेली असूनही .... माकडापेक्षा किंचीतही अधिक बुद्धी न वापरणारे  "दुर्दैवी" लोक पाहिले की ,कीव येते आणि वाईटही वाटते !! आणि " डार्विनचा"  सिद्धांत अगदीच खोटा नसावा असे वाटू लागते ! "

अर्थात काही गोष्टींना ईलाज नसतो आणि उत्तरही नसते !! ...... फक्त माणसाने आपण "माकड" तर होत नाहीयोत ना , याची काळजी घ्यावी हीच सदिच्छा !!

--्---्---्--=--्---्-== ( हर्षल ) (2016)
****जुने मित्र ****

अनेक (१२ /१५) वर्षानंतर भेटणारे जुने "सहकारी" ( मित्र हा शब्द आजकाल फारच जपून वापरतो मी .. म्हणून " सहकारी" ..!! ) ... जरा अजबच असतात !! ते भेटले की आनंदही होतो ..अन क्वचित जराशी उदासीही येते !! ....

जुन्या स्मृतींचे एक कोडे आहे .... त्या सहज म्हंटले तर विसरल्याही जातात आणि विनाकारण आठवतातही !! ....पेटलेल्या आगीसारख्या अंगावर येतील किंवा जाणीव नसलेल्या प्रेतासारख्या नुसत्या अडगळ होऊन मनाच्या कोपऱ्यात निपचित पडून राहतील !!

जुने लोक भेटले की सगळे सगळे ढवळून निघते !! आयुष्यावर पुन्हा जुनी आश्वस्त ओढ वेटोळे घालू बघते !! ..... जुने पूर पुन्हा येतात !!
नवीन वसवलेले किनारे पुन्हा बुडून जातात !!

..... पुन्हा जुन्या संचिताचे आणि आकांक्षांचे भान जागते !! आणि पुन्हा एकदा मन आत्ममग्न होऊ पहाते !! स्वतःहून ...स्वत:साठीच !!"

--्---्---्---
**** एक संवाद  *****( सत्य आणि जसाच्या तसा  )

खुप जुना मित्र भेटल्यावर माझ्याशी बोलताना .......

 मित्र : आहेस कुठे ? अजून समाजसेवा चालू आहे का ? स्मृति विचारत असते नेहेमी !! पत्ता काय तुमचा गुरुजी ??

मी : असतो इथेच ! तुम्ही दोघे कसे आहात ? समाज सेवा कसली ??

मित्र : ( तोंड भोपळ्याईतके मोठे करून )कसली समाजसेवा काय  ?? ..इतके वर्ष काय करत होतात गुरुजी... तीच!! आजकाल बदललायस तू !! आधी असा नव्ह्तास !! You were just an Extra Ordinarily Inspirational then  !! Srry to say..  but Now you are just like a casual person !! काय झाले साहेब ?? ...such a big transformation ???

मी : not at all ! वयोमानानुसार जरा शहाणा आणि शांत झालोय !! Nothing else !! btw ..तुम्ही दोघे कुठे असता सध्या ?? sorry fr not keeping contact ! तसा मी अलिप्तच असतो ! you know it !!

मित्र : we were in Australia !! कडक लाईफ !! enjoyed a lot ..!! marriage plus honeymoon !! all the way for 3 years !! No obstacle ....just fun !!! Just returned to india !! smruti too got job here !  .... and I have also got a better project  !! So... गुरुजी ! We are back !! ...7 years later ....back to india ! I have got 17 lkh package and smruti has got 11 lakhs !!  आहेस कुठे !!

मी : तुमचे तात्या आणि आई आता खुश असतील !! बिचारे एकटे होते इथे !! आता सांभाळा दोघाना !!

मित्र : तात्या गेले मागच्या वर्षी !तेंव्हापासून माई खुप वेड्यासारखे वागते ! सतत रडारड !!  ....So ...no option ....tila old care center मधे ठेवलेय !!.... करणार कोण तिचे सगळे घरी ??  ...ofcourse we both go and meet our mom once a week !! कितिही बिझी असलो तरी !! शेवटी आपणच बघणार ना तिच्याकडे !!! ...तरी रडत असते... आम्ही वेळ देत नाही म्हणून !! i tell you ...old people are just like that !! We pay 20000 per month for mom ....and she just cant understand !!

मी :  I don't think you can ever understand !! हे सगळे समजायला वेगळे शिक्षण आणि पॅकेज लागते ! दुर्दैवाने ते तुम्हाला मिळाले नसावे !! whtaspp वर माईंचा पत्ता पाठव !! भेटून येइन !! जमले तर तुम्ही सुद्धा या !! बाकी सगळे मजेत आहे !! .... समाजसेवा आणि मी सुद्धा !!

--्---्--- या पुढे बोलावे असे काही  उरत नाही !! संवाद संपलेला असतो .... किमान माझ्यासाठी तरी !!

--्---्----्--- हर्षल !! ( २०१७ )

*** नव्या नीतिकथा !! **

***** नव्या नितीकथा ****

जुन्या काळी अनेक नितीपर गोष्टी आपण वाचल्या !!
ह्या नवीन युगातल्या नितीकथा !! माझ्या लेखणीतून ....!! 

कथा क्र. ३ --  " सब कुछ चलता है ! "

"hello सर . "  एका मुलीच्या हाकेने माझे लक्ष वेधून घेतले आणि रेल्वे स्थानकावर चालता चालता मी थांबलो !! मागे वळलो !
" काय म्हणतेस ...इकडे कुठे आज ? " मी विचारले !
 ...एक जुनी B.E passout  विद्यार्थिनी बऱ्याच महिन्यानंतर भेटली होती !! संवाद सुरु झाला ....

ती : " अजून आहात का इथेच सर ?"

मी : " हो मग ... गरीब मास्तर कुठे जाणार !"

ती : " ( हसून ) .. काय सर तुम्ही पण !! "

मी : " तुझं कसे चाललय ? "

ती : " i am working in my Dad's business  only "....  लग्न सुद्धा करायच ठरतय .. May be after 4 months !! ...याल ना ?.. i am goin to invite ..ofcourse !"

मी : नक्कीच !! Gd to hear that news !! अभिनंदन !! काय करतात तुझे नवरदेव ?

ती : sir ..its love marriage !! सो I know him personally ! He is B.tech plus MS frm US !! दिड वर्ष झाली आम्ही भेटलो त्याला !! .. since then we are together !..एक मिनिट.. हा बघा फोटो !! कशी वाट्तेय आमची Pair ? !!

मी : great !! छान दिसताय !! ....अभिनंदन पुन्हा !!

ती : " चला सर .! Bye ! .. I shall invite you ofcourse !! या नक्की !! whtsap वर पण करेनच निमंत्रण !! gd to see you after a long time !!

( तेवढ्यात मला काहीतरी आठवले आणि राहावले नाही म्हणून हिला पुन्हा हाक मारली...ती वळली आणि परत आली .. )

मी : राग येणार नसेल तर एक विचारू .?.. सहज आठवण झाली म्हणून विचारतोय ...what about "that " guy in college ?  ...if i am not wrong !! मला एकदोनदा पाहिल्याचे आठवतय म्हणून विचारतोय !!
No force ! ...if u wish only then answer  ! correct me if i am wrong ! तसही आता तू आमची official current student नाहियेस !so you can decide not to give answer ! i wont mind at all !

ती : " ohh..not at all सर !! ..आणि तुम्ही म्हणताय ते ना ..!! thts ok ..! नो प्रोब्लेम at all !!
मला वाटले एवढे काय सिरियस विचारताय की काय !! .सिंपल आहे सर ! .. its over...just breakup  !!  from both of our sides !! we were not compatible असे मलाच शेवटी realize zaale  !! after that , थोडे भांडण झाले ....few tantrums ...few obstacles , emotional dramaa n all ... !! ... .but i sorted out everything  !! finally it was over !! Thts it !! ....Now new beginning ..and i really deserve it  !! ...."

मी : एवढ सोपे असते का ?? योग्य -अयोग्य ही वेगळीच गोष्ट आहे...त्यात मी शिरतच नाहीये !! but hw you ppl cope up ? ..ते पण इतक्या आरामात ?  !!

ती : सर ,its easy !!अभी "सब चलता है !! i dnt feel anything now !! आजकाल चालत, हो सर !! being  practical is imp ! मला तरी वाटते की ,जे झाले ते Best !! i got better one !! ...anyways बाय सर !!

( मनात आलेले बरेच प्रश्न मनातच ठेवून मी तिला शुभेच्छा देत निरोप दिला .... !! अवघ्या तेवीस चोवीस वयातली ही मुलगी अगदी पाचच मिनिटांत खूप काही शिकवून गेली !! ....काळ झपाट्याने बदलत चाललाय आणि नवीनच निती जन्माला आलेली आहे हे मात्र खरे !! ती योग्य की अयोग्य ह्याचा विचार ज्याने त्याने करावा !!

 ...... एक मात्र खरे ....प्रेम नावाची सुंदर गोष्ट इतकी स्वस्त ,बाजारू आणि क्षुल्लक होऊ नये इतकीच इच्छा आहे !! नाहीतर ; " प्रेम " या उदात्त विषयावर एकमेवाद्वितीय आणि महानतम लिखाण करून जो अजरामर झाला त्या शेक्सपियरला सुद्धा लोक म्हणतील ...की , " बाबा रे शेक्सपियर , तुला प्रेम कधी कळालेच नाही !! तू खूपच आणि नको तितका खोल शिरलास आणि प्रेम म्हणजे खूप मोठी गोष्ट असते वगैरे काहीतरी लिहित सुटलास ! तू लिहिलेले सगळेच साफ चुकिचे आहे ! अतिरंजीत and hypothetical !! ...love is not that great at all !! You were impractical and unrealistic  Mr.Shakespeare !! in today's world , इधर सब कुछ चलता है और गधा भी घोडे की जगह बिकता है !! "...
 ...किमान इतकी तरी वेळ येऊ नये हीच इच्छा !!

एक वाक्य आठवले ...
" जशी उत्कर्षाला सीमा नसते तशीच अध:पाताला सुद्धा नसते !!

--्---्---======= हर्षल ( from my writings 2017 )

वाकशुद्धी !!

*** वाणीची शुद्धता ( वाक्शुद्धी )  *****

वाचा किंवा वाणी स्वतंत्र असते .मन ,बुद्धी आणि वाचा व्यक्त करणारी इंद्रिये (मुख,जीभ ,गळा ईत्यादी ) या सगळ्यांतून ती व्यक्त होते.निर्मित होत नाही !
" चत्वारी वाक् पदानि.." ,.." ऋचो अक्षरे परमे व्योमन"... (--  ऋग्वेद अस्यवामीय सुक्त ,पुरुषसुक्त आदी ) , वाक्यपदीयम आणि उपनिषद आदी वेदांताच्या सिद्धांतावरून वाणी चार प्रकारची आणि स्वतंत्र संचरण करणारी देवता आहे !
आपण बोलतो ती वैखरी ....
अंतर्मनात वाहते ती मध्यमा ...
इंद्रिय सुषुप्तीत वाहते ती पश्यंति ..
आणि अनाहत अतिंद्रिय असते ती "परा" !

वाक्देवता ...शारदा .... सरस्वती ही ह्याच चतुर्पदीय वाणीची नावे आहेत !
याच वाणीला वेदादी शास्त्रान्मधे सरस्वती.. गौ ..आदी नावानी स्वरूप दिलेले आहे !
वाणीच्या चार पदांपैकी केवळ वैखरी ( म्हणजे आपण बोलतो ती ) एवढीच मर्त्य लोकात प्रत्यक्ष असते.नाद,ध्वनी ,स्तुती ,गायन ,कलह ,आक्रोश,
हास्य , दु:ख, रुदन (रडणे) ईत्यादी सगळे च्या सगळे मानवी व्यवहार जीवाच्या बुद्धी आणि मन व इंद्रियादी गोष्टींचे संस्कार घेउन ही वैखरी करत असते ! म्हणून वैखरी ही आपणास अत्यंत महत्वाची होय !
ही वाणी व्यक्त होताना बुद्धीचे विचार वा विकार आणि इंद्रियांचे संस्कार घेऊन मुखातून बाहेर आणि आत गमन करते ! इंद्रियांचे विकार आणि बुद्धीचे व मनाचे विचार याचे वहन करताना वाणीवर काही दोष अथवा गुण लिप्त होतात ! मनुष्य जिवंत असेपर्यंत वाणी या गुण वा दोषाने लिप्त होऊन राहते व स्वत:ला व्यक्त करते !
वाणी दुषीत अथवा कुपित होते तेंव्हा कलह,विभ्रम ,भय ,जिव्हा-कंपन, दंभ आणि वागिंद्रिये अनावर करणे असे अनेक प्रभाव मनुष्यामधे उत्पन्न होतात !

साध्या भाषेत सांगायचे तर आपण म्हणतो ना
" एखाद्याचे तोंड अफाट आहे वा अमुक एकाच्या बोलण्यावर नियंत्रण नाही  ईत्यादी.." वाणी दूषित वा कुपित झाल्याचे ते प्रभाव असतात !
अज्ञान, अहंकार ,मद ,मत्सर,दंभ,क्रौर्य,बुद्धीहीनता आणि लोभ या जीवातील बुद्धी व मनोजन्य विकारांच्यामुळे वाणी प्रथमतः दूषित व नंतर कुपित होते आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून ती मन आणि बुद्धीवर प्रतिघात करते ! विभ्रमीत,वाटेल ते बोलणारी ,अनावर ,बेधुंद आणि आचरट बडबडणारी माणसे हा त्याचा प्रत्यक्ष पुरावा होय !
मानसिक विकार आणि वाणी विकार असे दोन परस्पर पूरक विकार सनातन शास्त्रवर्णित आहेत !
मनाच्या असंस्काराने वाणी दूषित होते आणि कुपित (क्रोधीत/पीडीत ) वाणीमुळे मन कंपायमान वा विभ्रमीत होते ! ......अज्ञानामुळे माणसाला वाटते आपण जे बोलतो ते आपल्या शक्तीने ! यातले रहस्य असे आहे की वाणी माणसाची नसते तर फक्त व्यक्त झालेले विचार आणि व्यक्त करण्याची इंद्रिये त्याची असतात ! हा अक्षय ईश्वरी सिद्धांत आहे ! वेद वेदांत आणि स्मृती व पुराणांत याची अनेक प्रमाणे आख्यानरूपात आहेत .

म्हणूनच प्रत्येक मनुष्याने वाणीचा आदर करून  संस्कारपूर्वक व संयमाने तिचे वहन केले पाहीजे !
वाणीचे दोष जाण्यासाठी ईश्वरीय संधान आणि जप व सत्संकार आदी गोष्टींची बुद्धीपूर्वक व धर्ममान्य विधीनुसार संगत करावी ! वाणीचा दोष अनेक महादोषांपैकी एक आहे ! तो लागला तरी कळत नाही इतका समजायला सूक्ष्म आहे ! आणि बहुतेक सर्वत्रच हा दोष आहेच ! अत्यंत सदाचारी  व जितेंद्रिय महापुरुष सोडले तर बाकी मर्त्य मानवांचा या दोषामुळे लिप्त असा व्यवहार सर्वत्र पहायला मिळेल ! कलियुगात तर विचारायलाच नको !!
अर्थात या वाग्देवतेची योग्य उपासनेने कृपा प्राप्त करणे व वाणी शुद्धता राखणे याकडे आपण लक्ष देणे अत्यावश्यक !
वाणी अनुत्पन्न वा सनातन देवता आहे !ती कुपित होऊन आपले अकल्याण न करो अशीच प्रार्थना शास्त्रे मानवाला शिकवतात !
" महो अर्ण: सरस्वती .. प्रचेतयति केतुना !
 धी: यो विश्वा विराजति ! ( ऋग्वेद १ मंडल )
(महान विस्तृत सरस्वती जी बुद्धीला चेतन करते;
ती समस्त विश्वात विराजत आहे तीचे ध्यान स्तुत्य आहे )

म्हणून समर्थ लिहितात
" नमू शारदा मूळ चत्वार वाचा "

ज्ञानेश्वर माऊली लिहितात
 " ती अभिनव वाग्विलासिनी ..नवनवोन्मेषशालिनी ..नमिले मियां !!

( संदर्भ : ऋक यजु साम वेद , स्मृती व उपनिषदे )

--्---्-- अस्तु लेखनसीमा --्-

--्---्---्---  हर्षल !!!

ऋणानुबंध !!

***** ऋणानुबंध  ******

बऱ्याच मोठ्या कडकडीत दुष्काळानंतर ... अश्राप श्रावण सरींचा वर्षाव संपूर्ण धरती भिजवून टाकताना, ते दृष्य पाहून जसे मन भरून येते ....! ... तसेच आयुष्यात काही जुन्या ओळखीतली माणसे अगदीच अचानक भेटल्यावर वाटत राहते ..... !  कारण या साऱ्याच्या मध्ये प्रचंड काळ वाहून गेलेला असतो !
खरे म्हणजे इतक्या काळानंतर त्यांची व आपली ओळख आणि आठवण दवाने झाकलेल्या काचेसारखी धूसर झालेली असते ! आणि मग अचानक ही खुप जुनी माणसे चंद्रासारखी उगवतात आणि आठवणीतले आकाश पुन्हा एकदा लख्ख उजळून जाते !
जुने स्मृतींचे सांधे जुळायचा प्रयत्न करू लागतात ...! सरलेला काळ जिवंत होतो ! ...
..... सरत्या वयाचे भान येते ... गताची हुरहुर लागते ..आयुष्यावर एक उगाच क्षणाचा पीळ बसतो ...पायाखाली पुढे बघत चालणारी नजर अकस्मात मागे वळते आणि लांबवर मागे पसरलेले रस्ते आणि मिटून गेलेली काळापल्याडची जुनी क्षितिजे दिसतात !!

..... खुप जुने लोक भेटले की काळजाचा कुठलासा वेळेने बंद केलेला कप्पा अचानक उघडला जातो ! ... मग पुढे बरेच दिवस.. या जादूच्या कप्प्यातून स्मृतींचे आणि स्मृतींत दडलेल्या आपल्या त्या वेळच्या अस्तित्वाचे नवीन नवीन बोध मनावर स्वार होत राहतात ! ..

.... हा चमत्कार काही सामान्य नव्हे !!

--्---्---्--- हर्षल --्-*

Tuesday, October 29, 2019

"वाकले तिकले "!!

"तुला भरवू का ,सोहम ?"

" ना.."

"असे काय करावे ..बाळा ?"

"ना ..ना ..."

"अग ,त्याला लगावं दोन चार रट्टे ! ...लाड करून करून माजलाय !"

"अहो .. काय भाषा ही ...गोंडस पोराला असे बोलताय?  प्रोफेसर आहात ना ..बाहेर अगदी गोड ..आणि घरात स्वतःच्याच बाळाला असे  बोलताय ?"

"त्या आपल्या गोंडस कार्ट्याने माझ्या बॅगेतून मार्कर काढून माझ्या पांढऱ्या नवीन कुडत्यावर नक्षी काढलीये ,! धरून चोपणारे बघ मी !"

"" वाकल्या तिकल्या ...माल्ल्या ..मी लेघा ... बाबू च्या डेस वल !"

"थांब तुलाच वाकडा तिकडा करतो ! आईच्या लाडाने शेफारलाय !"

" अहो ,तुम्ही का चिडचिड करताय इतके ?..लहान आहे आपला मनुडा ...! बघा कसा हसतोय गुंडू ! ...ये .. ग ..ती माझी पप्पूडी ...माज्जा तो गोग्गोड सोन्या !!...बाबूला म्हणावं मला ओड्डू नका ...मी मश्ती कलनाल नाही तल कोन कलनाल ?..विचार बाबांना !""

" आम्ही असली मस्ती करत नसू .... विचार तुझ्या सासूला !"

" आईच परवा सांगत होत्या .... 2 कि 3 वर्षाचे असताना बाबांची टोपी जाळली होतीत फुलबाजीने आणि आईंच्या हाताला पण भाजले होते !"

" काय सांगतेस ...!! ..बर ..बर .!! ..हो ...आई म्हणाली होती एकदा ...! पण ते मुद्दाम नव्हते केले ! अगदीच पिंटुकला होतो मी.. i mean किती छोटा होतो ...त्यावेळी   !"

"मग हा अजून 3 होतोय पूर्ण .... मोठा झालाय का इतका ?बिचारा ...बघा कसा बघतोय तुमच्याकडे ? अजून ओरडा माझ्या पिल्लावर ! "

" अरेच्चा  ! कोण रुसलंय बाबावर "! बाबू चा डेस याक याक होता .....कोणीतरी छान छान लेघा माल्ल्यात ? त्याला बाबू गम्मत देणारे ! आमच्या पिल्लू ला कोण ते ओरडले !! आईला शांगा ....बाबू चूकून ओरडला आमच्या मनूडी ला !! ..ये इकले ....बाबाकडे "!!

"" वाकला तिकला ....बाबू चा डेस ....बाबू कले जायचा ""

----------------------- +*****-----------------

Saturday, May 25, 2019


**** महामंथन*****-

संदर्भ न देता भरून आलेले संध्यासमयीचे आभाळ बघत पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणाऱ्या माझ्या अविश्रांत नजरेतून एखादा काळाभोर मेघ चुकून
सुटका करून पसार होतो ...!!
मी जरासा वळून, तो दक्षिणपंथी कृष्णमेघ कुठे दिसतोय का ते पाहातोय ..... एवढ्यातच ...सूर्य बुडाल्याचा डंका पिटत अंधाराचा पहिला निळाशार सोनेरी मुलामा अवकाशात पसरतोच !! ....
एक प्रकाशावर्तन संपून सृष्टीचे रात्रमंथन सुरु झालेले असते !
पर्वतांच्या रांगा मस्तकावर सन्यस्त रंगांचे अनाकलनीय मुकुट
घालून बसतात ! समुद्रांच्या लाटा दूरदूरच्या अज्ञात प्रदेशांतून अंधार वाहून आणतात .... ! गंभीर नाद आणि हलणारा अंध:कार !! ... उधळलेल्या मृगांसारखा खुळावलेला वारा यांचा मदतनीस होतो !!
चंद्राचा पंथ उजळायला सुरुवात झालेली असते बहुदा !!
मी या दृष्यमान निसर्गचित्रात जखडून जातोय ....अलवार पणे !!
... संधीप्रकाश हीच संधी शोधत असतो ... ! काळजात झिरपायची ... !! आणि तो पाझरतोच ... !! मनाच्या मूक असंख्य फटींतून ... सांदीकोपऱ्यान्तून !! अनंत स्मृतींच्या अनिवार जंजाळांतून !! ... खोल दरींच्या तळाशी पहुडलेल्या सर्पाला काबीज करण्यासाठी अत्यंत वेगाने झेपावत जाणाऱ्या वैनतेयासारखा !!

अखेर .... !! गरुडाला सर्प गवसतोच !! मनाची कवाडे उघडतात ! काय अंतर्यामी  जाते ; काय उत्सर्जित होते ... त्याचा नक्की हिशेब मनाला देखील कळत नाही !
एक मात्र निश्चित .. की ,
बाहेर शांततेचे जयघोष असतीलही कदाचित ,
परंतु आत ... मनोमय महासागरात ,विस्तीर्ण मंथन सुरू झालेले असते !!
..... हा काही सामान्य चमत्कार नाहीच !!

--्---्---्---्- लेखन --्- हर्षल 

Wednesday, January 16, 2019

स्व-संवाद ...!!

अंधारावर प्रकाश अलगद जिंकत जातो ...सुखाचा दु:खावर अल्लड वेढा पडतो !
 चंद्रमंडलावर मेघांचा ,सरोवरांवर कारंडवांचा
,सागरनिळाईवर सांध्यछायांचा आणि
मनावर ...प्रच्छन्न समाधानाचा आणि आभासी वास्तवांचा .... असाच वेढा !!
सत्य शोधण्यासाठी सुर्याकडे पहात ;आत्मबलाने
पाय उचलून देवयान पंथावरून चालता चालता
 देहाच्या प्रत्येक शबल उर्मी ..संयमीत करीत ;
वेदद्रष्ट्या ऋषीसारखे स्वार्थापासून संपूर्ण निष्कासित होऊन असीम प्रज्ञेच्या निजानंदात राहायचे की ,
अमूर्त काळाला नमन करीत त्याच्या प्रवाहात विश्वाबरोबर वहात जायचे आणि असंख्यातील एक तसाच "नगण्य " जीव म्हणून अनावर आयुष्य आवरता आवरता सरून जायचे.... हा एकच प्रश्न आहे !!

याचे उत्तर मिळाले तरीही, तसा काही मोठा
 भेद बाह्य-विश्वात होईल असे नाही !! ...
पण खरे सांगायचे तर आपणच विश्वाचे द्रष्टे असतो !
त्यामुळे बदल आपल्या"आत"झाला ;
तर तसेही "बाहेरचे"सगळेच संदर्भ बदलतातच !!

--्---्-- हर्षल (जानेवारी २०१९ )