Saturday, December 31, 2011

सुभाषित .......2..!!

 विचारोनी बोले विवंचोनी चाले 
 तयाचेनि संतप्त तेही निवाले 
 तयाचे पुढे शोक संताप कैंचा 
 जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा !!.....समर्थ रामदास स्वामी !!




या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी !!!

 अर्थात "सर्व प्राणी जेंव्हा रात्री निद्रिस्त होतात तेंव्हा संयमी [योगी]जागा असतो.."याला आध्यात्मिक अर्थ मोठा आहे ...असो..


भगवंताने ५००० वर्षांपूर्वी हे सांगितले तेंव्हा ३१ डिसेंबर च्या पार्ट्या होत नव्हत्या ....नाहीतर भगवंत म्हणाले असते...

या "निशा" सर्व भूतानां ;तस्यां जागर्ति मद्यपी !!

सुभाषित ......!!

आघ्रातम परीचुम्बितम ननु मुहूरलिढम
ततः चर्वितम..!!
त्यक्तं वा भुवि नीरसेन मनसा ..तत्रं व्यथा मा
कृता!!
हे सद्रत्न ,तवैतदेव कुशलं ;यद्वानरेणाsदरात 
अन्तःसारविलोकीन व्यसनीना चूर्णीकृतं नाश्मना:!!


हे सुंदर रत्ना ;एका माकडाने तुला उचलून हुंगले ;चोखून किंवा चावून बघितले आणि जमिनीवर फेकून दिले यामध्ये वाईट वाटून घेऊ नकोस [ शेवटी ते माकड आहे !!]...उलट प्रत्येक गोष्टीत आत काय दडवले आहे अशी उत्सुकता असणार्या माकडाने तुझ्या आत काय आहे या उत्सुकतेपोटी तुला फोडून नाही पाहिले यात स्वताला भाग्यवान समज..........[नाहीतर तुझे अस्तित्वच संपले असते ].!!


   

Thursday, December 22, 2011

देवाचा अनुभव ............!!!!

आनंद आहे......जे जे हवे ते ते अवचित मिळते ...आणि विचार करून डोके थकून गेल्यावर जे विचार केलेही नसतील त्या मार्गाने मिळते हा एक थक्क करणारा अनुभव परत गाठीशी बांधला गेलाय..........

छान आहे.........अजब माया देवा तुझी !! 

सगळे प्रयत्न आणि तर्क संपल्यावर देवाच्या साम्राज्याची हद्द सुरु होते असे म्हणतात............भले मोठे माजलेले गर्व जिथे सटकन उतरून जातात अशी ही देवाची साम्राज्य सीमा...

खरच अफाट आहे सगळे.......शौर्य ;धैर्य आणि समाधान सगळेच देव देतो ......सगळेच देवाचे आहे........

उपनिषदात म्हंटले आहे ...
"त्वमेव सृष्ट्वा त्वदेव प्राविश्यत!!"
 अर्थात तूच सगळे निर्माण केलेस आणि तूच त्यांच्यात प्रवेश करून त्यांना व्यापून बसलास.............

निर्मिती आणि निर्माण करणारा एकच आहे....निर्मिती जी असते त्यांच्या क्रिया निर्मिकाच्याच क्रिया असतात..........जबरदस्त सत्य आहे हे ..सगळ्यात मोठ्ठा चमत्कार आहे हा !!!

अनुभव घ्या अनुभव घ्या ....काल तेच सांगण्यासाठी वाहतोय....सत्य समजले कि मुक्तता येते!!!......................


खरच ..""जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ".........देवत्व असेच आहे असे वाटते !!!


 
=========================लेखन -----हर्षल-------------

Monday, December 12, 2011

प्रेमांगीनी !!............old .classic style poem!!


हास्य तुझे कि;तुषार गंगेतील शुद्धसार?
रूप तुझे; जलवंती लाटांचे गर्वभार !!


मौक्तिके विशेष धुंद ऐसे तव अश्रू स्पंद !!
कलिका नवजात कुंद ऐसे तव वृत्ती छंद !!


लाघव सौहार्द तुझे कनकासम ये झळकून..
प्रेम तुझे नीलवर्ण जलधीसम ये भरून ..!!


रात्रींच्या विवरांतून अंधकार ओलांडून 
धावतात रवि-शर जे तेज नवे आश्वासून ..!!
ये तशीच प्रियवदने ;विश्व सर्व उल्लंघून..
प्रेम ज्योत स्निग्ध तुझ्या अंतरात चेतवून ...!!







.............लेखन -हर्षल.------------------------------
[जुन्या लेखन पद्धतीप्रमाणे रचलेली एक कविता ].......[काही कडवी लिहिलेली नाहीत !!]...

Sunday, December 11, 2011

.!!..संध्याकाळ ..!!

संध्याकाळ होते.........आणि शांत आकाशात उगाच काहूर उठल्या सारखे पक्षी पसरतात..

गर्दिंचे पूर वाहतात रेल्वे स्थानकांवरून....

सूर्य पार बुडालेला असतो...आणि त्याचे भगवे उत्तरीय मेघांच्या दाटीत अलगद अडकून पडते..ते सोडवताच अंधाराचे निळेशार पडदे
झाकून घेतात आकाश अगदी घट्ट............

मी शांतपणे चालत असतो ..गर्दीमधून एकटेपणाने ....कर्कश्श आवाजात बहिरेपणाने;अफाट बोलणार्या माणसांमधून मुकेपणाने ...

बाजार तुडुंब भरलेले असतात ...विजांच्या दिव्यांनी चकाकत असतात ...लोक खरेदी करत असतात; घरी पळत असतात ;जागोजागी चहा पीत असतात ;खात असतात ....अगडबंब जत्रा नुसती सगळीकडे ..आणि हे रोजचेच आहे...प्रत्येक संध्याकाळ गर्दीची;माणसांची आणि चीत्त्यासारखी वेगवान ..!!!

मी गर्दीत बोलत नाही....पाहत जातो..!!...एकट्याने चालत जातो..!!
मनात प्रश्न येतात अनेक त्यांना उगाच टाळत जातो....
अनेक न सुटलेली गणिते नेमकी संध्याकाळीच का आठवतात कुणास ठाऊक??
मी असाच संध्याकाळ बघायला सरावलोय..!!..तिला अर्थ नाही आणि स्वार्थ सुद्धा नाही...किमान माझ्यासाठी तरी..!!

आणि अवचित कुणी भेटते ओळखीतले..किंवा असेच कधी छेडले जातात हृदयाचे झंकार...आणि माझा अबोलपणा मोडून पडतो एखाद्या संध्याकाळी..अगदी वादळाने उखडलेल्या वृक्षासारखा  ;माझ्यापाशीच !!

उगाच वाटून जाते की,बरेच हरवून गेले...बरेच काही मिळाले ...पण नक्की हिशेब लागतच नाहीये ...!! 
बराच काळ सरला पण निरुत्तरित प्रश्न अजून तसेच...काही बंध निर्माण होण्या आधीच तुटून गेले कि काय ,काही अगदी अबोध पण निस्सीम प्रेमाचे नाते हरवून गेले कि काय..!!

काही गोष्टी जमल्याच नाहीत ...काही तारा जुळल्याच नाहीत ...अगदी आपल्यासाठी हवी होती अशी एक प्रेमळ हाक अजूनसुद्धा परकीच राहिली....आणि आपण वाट बघतोय त्या आवाजाची ...त्या होकाराची ..त्या कधीच  न जुळलेल्या नात्याची .... 
........!!

.......मग मी स्वतालाच सांगतो...त्याच अशांत संध्याकाळी, घरी परत जाताना... गच्च गर्दीत घुसमटलेल्या रेल्वेतल्या माझ्या अवघडलेल्या देहातील खिन्न मनाला ..मी म्हणतो 
"जाऊ देत मित्रा;
सगळीच कोडी सुटत नसतात;सगळेच बंध जुळत नसतात ;मनाला जसे हवे तसे सगळेच फासे पडत नसतात....""

.....गर्दीबरोबर मी स्वतःला शांत करत रेल्वेतून उतरतो..घर गाठायला परत रस्त्यावरच्या गर्दीत मिसळतो..चालत जातो.....!!


..संध्याकाळ बाहेर आजूबाजूला पसरलेली असते..आणि मनात विनाकारण अंधार दाटून आलेला असतो..त्यात माझे मन मलाच दिसत नाही;ईतके बुडून गेलेले असते..!!.......उगाचच!!



-----------------==लेखन -- हर्षल...........

[काल्पनिक ]

Sunday, December 4, 2011

स्वप्ने...!!!


स्वप्नांची उद्दाम कलेवरे नाचतात जेंव्हा
डोळ्यांच्या लहानशा विश्वात ..
जड होतात पापण्या आणि असह्य होतात 
आशांचे आघात ..!!!


स्वप्ने किती मोठी किती विशाल !!
आणि किती लहान शबल आपले कपाल..!!
स्वप्ने जाणत नाहीत नियतीची भेसूर बंधने ..
जाणत नाहीत देहाचे बद्ध कोश...
आणि मद्यमत्त असुरान्सारखी बेहोष होऊन गिरक्या घेतात ..
हृदयाच्या संकुचित धरणीवरती ...!!


स्वप्नांची राज्ये मोठी असतात ..
अवाढव्य असतात त्यांचे संभार ...
राक्षसी असतात त्यांचे आशावाद ...
माणसाचे शरीर पोखरून टाकतात ते..
आणि कोलमडून जाते स्वप्नाच्या ताणाखाली ..
आयुष्याचे सुंदर स्वरूप...


आयुष्ये कित्येक मालवून जातात ..
आणि स्वप्ने मात्र तशीच ...अथांग..उद्दाम..
एका देहावरून दुसर्या देहावर स्वार होतात ..
आत्म्यांसारखी.....!!!


.................लेखन --- हर्षल..!!

Monday, November 21, 2011

दुःख .............!!!

दुखाचे पूर उतरले काळजात एकाएकी..
हतबुद्ध लोचनांमाजी आसवे जाहली जागी ..!!


कळते कोणास कधी का नियतीची अवघड चाल..
जगताना म्हणुनी होती अश्राप मनाचे हाल ...!!


आधार एकटा कोणी जाता  निघून वेगाने ...
शोधती मनाचे पक्षी ती स्वप्नांतील उद्याने ...!!


अंधार पसरता भवती ;एकांत घोर सजताना ...
उन्माद कसा रोखावा ;आयुष्य व्यर्थ जळताना ?




......................लेखन -- हर्षल.........

Thursday, November 17, 2011

आजचे ब्राह्मण -[अंतिम भाग ]-- माझा दृष्टीकोन


"Hey दादा; हे वाच मस्त लिहिलंय सुधीर गाडगीळ काकांनी "
माझ्या हातात एक लेख टेकवून मंदार दाते [second year B.E ] म्हणाला ..

"वाच ;जरा ;कसे असतो आम्ही चित्पावन ते कळेल म्हणजे "
हसत हसत तो लेख मला देऊन मंदार कट्ट्यावर बसला .

'मोजून मापून कोकणस्थ ' हा श्री.सुधीर गाडगीळ [पत्रकार ]यांचा लेख आधी वाचलेला होता...[ १९९९ च्या दिवाळी अंकात आला होता तो ].....डोक्यात फिट्ट होते सगळे शब्द त्यातले !! परत वाचायची अजिबात इच्छा नव्हती ...

असे लेख आता वाचून हसावे कि संतापावे तेच कळत नाही.मंदार कडे तो कागद फेकत मी म्हणालो ..""जरा काही चांगलं असेल तर दे वाचायला .. लहान मुलांच्या गोष्टी आणि पुचाट साहित्य मी आता वाचत  नाही  !!..काही अर्थवाही असेल तर दे..!!""



"ओ देशपांडे सर जी ;यार मस्त आहे हा लेख !!जुना आहे पण कात्रण म्हणून ठेवलाय मी.गांगल काकांना द्यायला आणला होता .सही लिहिलंय यार !"


"मंदार ;लेख कशाबद्दल आहे ?"


"चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण समाजावर आहे यार !!"


"एक काम कर मंदार ;त्यातला ब्राह्मण शब्द काढून टाक ;मग तो लेख चांगला आहे !!"


"म्हणजे?"


"त्या लेखात लिहिलेले वर्णन स्वभावाचे आहे..ब्राह्मण धर्माचे नाही ..आणि जातीचे स्वभाव म्हणजे ब्राह्मणत्व नव्हे..!!..स्वभाव म्हणजे ब्राह्मण पणा असे काहीतरी महामूर्ख समीकरण मी नुसते ऐकले तरी संताप चढतो मला!! "


"अरे एव्हढे भडकायला काय झाले .चांगलंच लिहिलंय त्यात !!"


"लिखाणाबद्दल आक्षेप नाहीये माझा .साहित्यिक अंगाने आणि विनोदी म्हणून फक्त जर लेख वाचला तर चांगला आहे !!परंतु स्वतःचे गुण किंवा दोष म्हणजे अमुक अमुक 'ब्राह्मण'असा शिक्का मारणे म्हणजे महान अपमान आहे ब्राह्मण ज्ञातीचा !!..ब्राह्मण लोकांनाच ब्राह्मणत्व समजत नाहीये असा सरळ अर्थ निघतो त्यातून..!!"


"यार दादा ;तू जाम सिरीयस होतोयस विनाकारण ;चल मी निघतो उद्या भेटूयात ..आणि बाकी मरू देत सगळे माझी mechanics ची आणि SOM ची केटी सोडव बाबा !!..उद्या सकाळी येतोय मी ..दोन लास्ट चाप्टर शिकव यार !..हालत खराब झालीये ..येऊ ना उद्या ??.पाहिजे तर फी देतो बाबा तुला.!!सिरीयसली यार तू शिकवलेले समजते ..येऊ ना उद्या !!

"ये रे ;आणि फी कसली रे दीड शहाण्या ??तुला एव्हढे शिकवलंय  मी कि, फी भरायची तू ठरव्लीस ना ;तर वल्ड बँकेचे कर्ज काढावे लागेल गाढवा !!..चल भेटूयात !!बाय "

हसत हसत मंदार साहेब घरी गेले..आणि मी कट्ट्यावर बसून असाच विचारात बुडालो...

देशस्थ ;कोकणस्थ ;कर्हाडे ही नावे ऐकून अगदी लहानपणी गम्मत वाटायची...विनोद करायची हुक्की यायची...देशस्थ अमुक असतात ;कोकणस्थ तमुक असतात असे वाचायला आणि फुकटच्या गप्पा मारायला बरे वाटायचे..!!


पण दैवयोग बलवत्तर ठरले..आणि खरोखर काही विद्वान लोक आणि त्यांचे लेखन वाचून डोळे उघडले..!!..सेतुमाधवराव पगडी एक थोर ईतिहासकार [आमचे नाते होते त्यांच्याशी हे मला फार नंतर कळले]
;द.वा.पोतदार;आचार्य अत्रे;बापट शास्त्री ;विश्वासराव देशपांडे ;पु.ना ओक ;लोकमान्य टिळक ;स्वातंत्र्यवीर सावरकर ;राजारामशास्त्री ;व.दा.भट;मोरोपंत ;अभ्यंकर शास्त्री ;पांडुरंगशास्त्री आठवले;दांडेकर मामा;ईतिहासाचार्य  राजवाडे ..आणि शिवाय अनेकानेक संतांचे साहित्य मी वयाची विशी गाठायच्या आतच वाचून काढले होते....
वरती जी नावे दिलीयेत ती वानगीदाखल !!


आता एक संत साहित्य सोडले तर लेखकाची स्वताची अस्मिता लिखाणात दिसते..तसाच देशस्थ किंवा कोकणस्थ लेखकाचा अभिमान डोकावतो हे मला मान्य आहे...परंतु कुठली गोष्ट व्यक्तिगत ठेवावी आणि कुठली गोष्ट प्रचारित करावी हे लेखकाची विवेकशक्तीच नियंत्रित करू शकते..!!....अत्यंत विद्वान लोकांनी ब्राह्मण जातीतील प्रादेशिक स्वभाव वैशिष्ठ्ये स्पष्ट करण्यासाठी हलकीशी जातीय टीका करणे मी समजू शकतो..परंतु सबंध ब्राह्मण समाज ब्राह्मणत्व विसरून फक्त अडाणीपणे जातीपातीवर गरळ ओकत एकमेकांवर टीका करताना;किंवा स्वतःचे स्वभावजन्य गुण- दोष "ब्राह्मण" या नावाखाली खुशाल दडपताना दिसला कि ;माझे रक्त तापून उठते !!


समर्थांनी [रामदास स्वामी] ब्राह्मण भ्रष्ट झाल्याचे नमूद केले आहे ;ते आम्ही विसरलो;

जुनाट पोथ्यांचे नवीन दृष्टीने अभ्यास करून धर्माधीष्ठीत अर्थ लावायला आम्ही विसरलो;

वेद ;पुराणे;ईतिहास ;विज्ञान यांचा ध्यास घेऊन अध्ययन आणि अध्यापन करायचे आम्ही विसरलो;

'ब्राह्मण आणि ब्राम्हणत्व' नक्की काय आहे हे आम्ही विसरलो;

मंत्रांचे उच्चार करून धार्मिक विधी 'उरकणे'आणि भट भिक्षुकी ला लाजीरवाण्या स्तरावर पोहचवणे आम्ही नवीनच शिकलो;

आम्ही संस्कार आणि शुद्धता विसरलो;

आम्ही निस्वार्थी  आणि त्यागी वृत्ती विसरलो;

आम्ही दयाळूपणा आणि धर्म विसरलो;

आम्ही ढोंगीपणाचा त्याग करायला विसरलो ;

आम्ही फक्त संतांच्या रचना गाण्यापुर्त्या आणि भाषणे ठोकण्यापुरत्या  शिकलो पण त्यांचे आध्यात्मिक महान संदेश आमच्याच हृदयात ओतायला विसरलो;

आम्ही ब्राह्मण म्हणून स्वताचा खरा ईतिहास बघायला ;स्वताची कर्मे तपासून बघायला आणी स्वतःमध्ये विवेक बाणवून घ्यायला विसरलो ;

आम्ही स्वतःची प्रादेशिक जातीय वैशिष्ठ्ये नको तेवढी कुरवाळायला शिकलो;

आम्ही स्वतःला एकात्मतेच्या ;बंधूतेच्या भावनेने बघायला पार म्हणजे पार विसरलो;

आम्ही; स्वताचे खोटारडे अहंकार ;क्षुद्र स्वार्थ ; जातीय विशेषत्वाची अत्यंत हीन लक्तरे आणी लहान सहान रूढी किंवा परंपरा यांच्या जाळ्यात अडकून स्वताचे संकुचित आणी महामूर्ख स्वरूप निर्माण करण्यात यशस्वी झालो आणि स्वताची खरी आणि शुद्ध कर्तव्ये निर्लज्जपणे विसरलो...

आम्ही;ब्राह्मण म्हणून नुसते जन्माला आलो पण "ब्राह्मण "व्हायलाच संपूर्णपणे विसरलो...
आम्ही फक्त भाषा;जाती आणि परंपरा यांनाच ब्राह्मणत्व मानत गेलो आणि याचमुळे स्वताचा आणि पर्यायाने समाजाचा सत्यानाश झालाय हेच विसरून गेलो...!!!

आम्ही ,फक्त पुण्याईवर जन्म घेतले 'ब्राह्मण' म्हणून; पण तीच पुण्याई योग्यपणे वापरायला विसरलो ;

आम्ही एकत्र यायला विसरलो आणि स्वतःचे स्वार्थ सोडून ;सुखाची  आणि भोगांची लालसा सोडून परमार्थ साधायला ;कर्तव्ये करायला विसरलो .;


किती लिहावे आणि किती नाही!!......अंतच नाहीये त्याला !!
नुसता महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखंड आर्यावर्तातला ब्राह्मण समाज केवळ कर्माने "ब्राह्मण"म्हणून ओळखला जाईल तेंव्हाच तो सुदिन ठरेल..!!...बाकी वर्णांना सुद्धा असेच एकत्र केले पाहिजे..!!


जो ज्ञानी असतो;निस्वार्थ आणि अनासक्त राहतो;
उप्भोगांमध्ये राहूनदेखील सत्यशील आणी विवेकी राहतो ;
अहंकाराचा जो त्याग करतो;
क्षमा आणी धर्म हे ज्याचे भूषण असते ;
ज्ञान हेच ज्याचे जीवित साधन असते ;
ज्याचे शब्द म्हणजे प्रत्यक्ष सत्याचे दुसरे रूप ठरतात;आणी ज्याचे सामर्थ्य संयमात असते .........तोच खरा ब्राह्मण !!


बाकी आपण सगळे स्वताला "ब्राह्मण" समजणारे आजकालचे लोक म्हणजे नुसतेच 'नावाचे 'ब्राह्मण!!..
"जन्मा येऊन जननी ,वायाची कष्टविली "..या प्रकारात मोडणारे !!

..आणि तसेही नुसत्या 'नावापुरत्या'च ब्राह्मण असलेल्यांनी स्वतःला "देशस्थ" म्हंटले काय किंवा "चित्पावन "नाहीतर कर्हाडे किंवा अजून काही नावे देऊन आयुष्यभर मिरवले काय ;....त्याने कसलाही  काडीमात्र फरक पडत नाही...!


एकच सांगतो ..
""जशी उत्कर्षाला मर्यादा नसते तशीच अधःपाताला सुद्धा सीमा नसते ""
 उत्कर्ष करायचा कि अधःपाताची खोल दरी उतरायची हे ज्याला त्याला समजावे हीच ईश्वरा-चरणी प्रार्थना !!

-----------------लेखनसीमा-----------------------!!


==================================लेखन--हर्षल==========







एक रात्र ..!!



धो धो पावसात एका चहाच्या टपरीवर मी कसातरी उभा आहे...

मध्य रात्र जेमतेम सुरु होईल आता..पण अंधार बराच झालाय...घराघरात खिडक्यांच्या काचा उजळून जातील असे प्रकाश उमटलेत...पावसाची रिपरिप वाढत चाललीये ....रहदारी संपून जाईल आणि लोक घरांत शांत झोपतील आता....
चहाचा कडक सुगंध थंड वातावरणात उब निर्माण करत पसरतोय आजूबाजूला...स्टोव चा फरफर करणारा आवाज आणि कानावर टोपी चढवून लगबगीने कुटलेले आले चहा मध्ये घालणारा मध्यम वयीन चहावाला ...आजूबाजूला गर्दी नाहीच...एक वॉचमन चहा प्यायला आलेला आणि एक मी ..असे दोनच गिर्हाईक..!!..

थंड सर्द वातावरणात हातात मोठी bag घेऊन आणि सोबत दोन दिवसाचा शीण मनात ठेवून मी बससाठी उभा होतो...  इतक्यात पाउस लागला ..नाशिकपासून पुढे आडभागातले एक लहान गाव ..दहानंतर सगळेच बंद होते बहुदा इथे !!.माझाच हट्ट लवकर घरी जाण्याचा !! म्हणून लगेच निघालो रात्री, मनात म्हंटले पहाटेपर्यंत पोहचू घरी !!..पण बस स्थानक रिकामे ..आठ दहा उतरणारे प्रवासी आणि तितकेच चढणारे !!..शिवाय त्यात हा पाउस कोसळतोय
!!
...."रात्री बस नसते रे !सकाळी जा "हे सरांचे उद्गार आठवले.. तसा उशीरच झाला पोहचायला ..आणि शेवटची बस निघून गेली होती आधीच १०.४५ वाजता !!
"आता पहाटे ६ वाजता बस येईल मुंबईकडची" तंबाखू चोळत "चौकशी खिडकीतला "माणूस म्हणाला .......!!
""रात्र भर बस आता भूतासारखा" स्वतःला असे म्हणत उगाचच त्या निर्जन बस स्थानकावरून इकडे तिकडे पाहिले तो एक चहावाला दिसला ...पोटात भूक होतीच! जेवण करून अडीच तास गेले होते..जेवण सुद्धा पोटभर नव्हतेच ..मग काय आधीच पाउस;त्यात निर्जन भकास एकटेपणा ;त्यात थंडी वाजतेय...सरळ चहाची टपरी गाठली..!!

हातातले सामान ठेवत ओलाचिंब होऊन टपरीच्या आडोशाला एका बाकड्यावर बसलोय ..टपरी सुद्धा नशीबाने चालू आहे .नाहीतर नेहेमी  दहा वाजता बंद होते!!..

पार्लेजी चा एकुलता एक पुडा बरणीत दिसला..तो लगेच घेतला विकत..तोवर चहा तयारच झालाय!!..
गरम  चहा आणि बिस्कीटे पावसात मस्त लागतात...झाली सुद्धा खाउन..दोन कप वाफाळता चहा आणि समोर तुफान पाउस..आणि कंदील लावून उजळलेली ती टपरी ...चित्रकाराला आव्हान देईल असे वास्तविक portrait उभे होते ..!! 

जरा उब आलीये शरीरात ..
पाकिटातून पैसे काढतोय इतक्यात प्रश्न आला ..चहावाल्याकडून...

"म्हमईच हाय जणू  दादा तुमी ?"

"हो"

"अन इतक्या रातीला का वो निगाला.यष्टी चुकली असल न्हायी ??"

"बस चुकली मामा ;काय करावं तेच विचार करतोय "

"हिथं आडगावात दिवसा सुदिक यष्ट्या कमी येत्यात ..अन रातच्या टायमाला तर धा नंतर येताच न्हाईत .."

"आता कळलं ते मला मामा ..अहो मी पहिल्यांदाच आलोय ..ठाउक नव्हते "

"सामान बी लय हाय दादा तुमच्याकड!!..कंच्या कामावर हाये तुमी ?"

"परीक्षेच्या कामासाठी आलो होतो नाशिकला .तिथून काम झाल्यावर या गावात आलो पाच वाजता संध्याकाळी ;ते श्रीपती बुवा आहेत न त्यांना भेटायला..पण ते आता गाव सोडून गेलेत हे नन्तर कळले ..इथे ओळखत नाही कुणाला म्हणून घरी निघालो होतो .."


"मास्तर हाय जणू तुमी ..!!..शिरपती तात्या कोण हो तुमचे?? ..मागल्या महिन्यातच गेले गाव सोडून ."


"अहो ते नात्यातले नव्हेत ..गोंधळी आहेत ना ते !! ठाण्याला एकदा
 भेटले होते तेंव्हा ओळख झाली ..पत्ता दिला होता ..म्हणाले घरी येऊन जा कधी त्या बाजूला आलात तर ..फोन नंबर नव्हता म्हणून थेट असाच आलो .." 

"मंग आता कुठशी जाणार ?..सकालपातूर तर यष्टी न्हाय तुमची ..!!"


"बघू थांबेन इथे ..नाहीतर बस स्थानकावर जाईन परत..सहा सात तास काय कसेही निघतील "


"आमच्या घरला येताय ?..मास्तर हाय तुमी आन दमलेले बी दिसताय ..पडा तिथ बिनघोर ..आन सकाली यावात हिथं ""

"अहो मास्तर म्हणजे मी काय फार मोठ्ठा माणूस नाहीये हो मामा ;तुमच्या मुलापेक्षा थोडासा मोठा असेन वयाने .आणि उगाच तुम्हाला कशाला त्रास ?..इतके बोललात हेच पुष्कळ आहे "



"अवो दादा ;हिथं पावसात भिजत राहाल आन थंडी पकडेल तुमाला ..अन चांगले तालेवार वाटताय म्हणून तर बोलवतोय घरला ..माजी पोर हायेत ना त्यांस्नी काय सांगा वाईच ..!!आमी काय शिकलो न्हायी ..तुमच तरी ऐक्त्याल !"

रात्री बाराच्या सुमारास चहावाल्या मामांच्या घरी गेलो...मामांचे नाव महादेव असल्याचे समजले.रात्री त्यांच्या त्या लहान वीट बांधणीच्या 
घरात निवारा मिळाला.त्यांची दोन मुले सरिता आणि वैभव अनुक्रमे ८वी आणि ५वीत होती.ती आगी झाली आणि त्यांच्याशी गप्पा मारत तासभर सहज निघून गेला..मामांची पत्नी अगदी साधी आणि प्रेमळ गृहिणी होती.झोपायला रात्री दीड वाजला..एक जाड गोधडी आणि हाताने शिवलेली जाड उशी घेऊन मी मातीच्या थंड जमिनीवर पाठ टेकवली.डोळा लागला तो एकदम सकाळी साडेपाच ला जाग आली.

स्नान शक्य नव्हते आणि म्हणून नुसते हातपाय धुतले..चहा घेतला ..[ह्याचे पैसे मात्र मामांनी घेतले नाहीत ]..सगळे आवरले आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन निघालो .....

इतक्यात मामा म्हणाले 
"मास्तर ;ऐकलंच हाय का अजून ;लगीन न्हाय केलंत?"

"नाही हो मामा ;एकटाच आहे अजून "

"करून टाका लवकर ;निस्त शिक्शान बी जल्माला सोबत न्हाय देत;बायको हवीच .बगा कुनीतरी कलेक्टर;डाक्तर नायतर हापिसर बाई ..तुमाला शोभल ती !! "

"[हसून]नक्की बघेन !! बर येऊ आता?"


त्यांची पोरे पाया पडली तेंव्हा प्रत्येकाच्या हातावर १००-१०० रुपये ठेवले ...मामा नको नको म्हणत होते पण त्यांचे काही ऐकले नाही मी....जाताना मामांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या पाया पडलो .फार साधी आणि छान माणसे होती ती !!


मला बसमध्ये बसवायला आलेल्या मामांना मी सहज हसून विचारले, "का हो मामा ;असे रात्री तर बरेच प्रवासी भेटत असतील सगळ्यांनाच घरी नेता कि काय ?..कि माझ्यावरच काही खास कृपादृष्टी ??"

मामा एकदम गप्प झाले ...
त्यांची कुठलीतरी दुखरी आठवण नकळत जागवली असेल मी ..

ते मला म्हणाले..
"माझा धाकला भाऊ होता ;एकलाच शिकला अख्या घराण्यात ;मुंबईला होता कालिजात अन पैका नसायचा हातात तरीबी शिकत व्हता !!..अन एक दिस थंडीतापाने मेला ..नन्तर कळलं कि रात्रभर पावसात बसला होता फलाटावर ..पैसे नव्हते जवळ आन घरमालकांनी भाडं भरायचा तगादा लावला आन घराबाहेर काढला रातीच्या टायमाला ...गावाकडे यायला निगाला व्हता पैशे मागायला ..पण ट्रेन चुकली नाशकाची ..अन तसाच कुडकुडत बसून राह्यला सकालपातूर..!! अन हिथ आल्यावर जो तापला तो त्यातच गेला !!
आज तुमी हाय ना तेच वय होतं त्याच !!..तुमी काल दिसले तवा वाटलं त्योच हाय .माझा धाकला कैलास !!"


मामांचे डोळे पाण्यानी भरून आले होते ..मी निःशब्द झालो होतो..

.....बस सुटली..मी मागे वळून पाहिले ..आपल्या अंगरख्याच्या बाहीने महादेव मामा डोळे पुसत होते..त्यांच्या लहान भावाला नुकतेच बस मध्ये बसवून दिले होते त्यांनी..!!

..मी खिडकीतून पाहत राहिलो ..शेवटी मामा अगदी दिसेनासे झाले...धुरळा खूप उडत होता ..मी मान आत घेतली..शेजारचे कुणी म्हणाले "अहो धूळ लई उडतीये पाणी आलंय तुमच्या डोळ्यात "

...खरच माझ्या डोळ्यांत पाणी जमा झाले होते ....पण डोळ्यांत धूळ गेल्याने हे पाणी आलेले नाही एव्हढे मात्र मला नक्कीच माहीत होते...!! स्वच्छ आणि निर्मळ माणसांची अचानक भेट झाली कि असेच माझे डोळे आपोआप स्वच्छ होत असतात ..!!



------------------------==========लेखन --- हर्षल----------




Wednesday, November 16, 2011

नॉट आउट पंच्याहत्तर !!...


"पन्नाशी झाली ;साठी समारंभ झाला ;सत्तरी ओलांडली आणि आता पंचाहत्तरी गाठ्लीये ....कठीण आहे रे !!.."

काल संध्याकाळी मीच माझ्या मनाला विचारत होतो वरचा प्रश्न !!

झालंय काय कि माझा ब्लॉग मला ७५ पोस्ट पूर्ण झाल्याचे दाखवत होता.....आणि मला अजून काय आणि किती लिहावे हा प्रश्न ते वाचून पडत होता...

लिहिलेले सगळेच मला अतिउत्तम दर्जाचे वाटत नाही.तरीही काही लेख मी असेच खरडून ठेवलेत.काही लेख मला अगदीच जिव्हाळ्याचे असल्याने ते मात्र मी आवडीने लिहिलेत......


लिहून मी थकलेलो नाही...कदाचित वाचून काही जण थकले असण्याची शक्यता आहे....काहींना आवडले असेल..काहींना अजिबात आवडले नसेल...पण तरीही मी लिहितोय ..आणि पुढेही लिहीन ..!!


लेखन ही मन मोकळे करण्याची सुंदर प्रक्रिया आहे...आपले शब्द आपल्याला पुनर्जन्म देतात आणि नवा उत्साह अंगात भरून जातात हे माझे स्वानुभवाने झालेले मत आहे...!!


असो...मी लिहितोय कारण लिहिताना होणारा आणि लेखन वाचताना होणारा आनंद मला अजून गमवायचा नाहीये ....आयुष्य जगताना जे समृद्ध आणि सुंदर स्वरूप मी मनात ठेवतो ..अपेक्षा करतो ..आणि प्रत्यक्षात जे विचित्र तरीही वास्तव असलेले आयुष्य पाहतो..त्यातून जी गम्मत घडते तेच "हर्षायन"...!

हल्ली जगताना ..कधी डोळे आश्चर्याने विस्फारतात ;कधी डोळे भरून येतात ;कधी जुन्या आठवणी दाटून उगाच पापण्या ओलसर होतात ;कधी क्रोधाने मुठी आवळतात;तर कधी प्रेमाचा स्पर्श लाभता हृदय शांत होते;कधी हास्य खुलते तर कधी दुःख फुलते ...असे अनेकानेक अनुभव जे पटकन शब्दांत पकडता येत नाहीत ..तेच अचानक हातांतून ब्लॉगवर अवचितपणे उतरून जातात...आणि ब्लॉगवरची "पोस्ट"संख्या वाढत जाते ....!!!भारताची वाढती लोकसंख्या जशी "आपोआप"वाढत जातेय तसाच माझा ब्लॉग सुद्धा लेखांच्या आणि कवितांच्या  संख्येने फुगत चाललाय..!!...ईलाज नाही त्याला ..!!..देवाची इच्छा!!.. 

असो....माझ्याच आवडत्या कवितेच्या चार ओळी लिहून लेखन थांबवतो..


"" पाहिले डोळे भरुनी वेदनांचे सोहळे 
   सुख आता पाहू दे..!!
   
   रात्र या नेत्रांत होती;
   बैसली कित्येक वर्षे 
   उदय सूर्याचा सुमंगल लोचनांना पाहू दे !!
   जाऊ दे तम घोर सारा ; 
   तेज आता लाभू दे ..!!




================================लेखन - हर्षल !!

Tuesday, November 15, 2011

मी आणि landline फोन ....!!

संवाद क्र.१.....

वेळ:सकाळी ९ ची  २०१० डिसेंबर   
प्रसंग:मी आवरून चहा घेत बसलोय ..लेक्चर ला निघायची वेळ झालीये ..इतक्यात ..
आमच्या घरचा landline जोरदार वाजतो ..!!...

[पलीकडून ].."हेल्लो ;हेल्लो; हेल्लो "

"ऐकतोय मी .बोला कोण हवंय? "

"ओळखलं नाहीस का माझ्या राज्जा!!..मी बोलतेय!!"

""मी" कोण ??..नाव असेल न काहीतरी !"

"ए अस काय रे करतोस सोनुल्या !!..उगाच नाटक नको हं गोन्डूल्या"!

"ओ बाई ,कोण हवंय तुम्हाला ??काय चावटपणा चाललाय ?"

"ईई बाई काय रे म्हणतोस जानू !..कसला चावटपणा रे ?..आणि तू काय ओळखत नाहीस माझा आवाज ??..माज्जा गोग्गोड सोन्या !! "

"कसला सोन्या ?..कोण जानू ?..कोण बोलताय आपण?"

"असा रे कसा तू ;रोज झाडाखाली भेटतोस न मला !!..स्वीटू!!"

"चायला ;कोण स्वीटू ?..तू कोण बोलतेस ते सांग..कसलं झाड ?..आमच्या घराजवळ झाड नाहीये ..गवत आहे फक्त गवत..ते पण दुर्वा असतात न तेव्हढ्या उंचीचे !!..मला झाडाखाली कोणालाच कधीच भेटल्याचे आठवत नाहीये..!!"

"अं ..काय रे !!असा का त्रास देतोयस मला?.मला छळू नकोस न रे ..आय लव यु ना माय डार्लिंग !!"

"ए बये ;कोण डार्लिंग ?..कोण पाहिजे तुला ;रॉंग नंबर लागलाय तुझा !!..तुझा जानू का स्वीटू कोण असेल तो मी नव्हे!!..अजून पर्यंत मी कोणाचाच "स्वीटू" झालेलो नाहीये .चल फोन ठेव.!!"

"ए शानपत्ती नको हं सोन्या !!..तूच हवायस मला डियर !!..ओळख ना मला ..चीन्गुल्या !!"

"अग बाई ,कसला चीन्गुल्या ??काय वाट्टेल ती नावे का देतीयेस मला??...मी ओळखत नाही तुला..तुझा नाव तरी सांग मूर्ख मुली !!"

"असा रे काय करतोस ?..नको ना वागूस असा !!आपण लग्न करायची शप्पथ घेतलीये ना..पिंपळाच्या खाली गणपतीसमोर !!मला सोडू नकोस असा!!माय स्वीट पपी!!"

"पपी??..कसला पपी ??,,कोण पपी ?..कुठला गणपती ?..कसला पिंपळ ??..अग ए महामाये मी काय गावातला उनाड वळू वाटलो का तुला ..म्हणे पिंपळाच्या खाली शप्पथ दिलीये !!..कोण आहेस कोण तू ?..पिंपळावरची चेटकी का ??..तुला अक्कल आहे कि नाही ?..कोणालाही फोन करून झाडाखाली भेटलास म्हणून सांगतेस !!"

"ए असं रे काय माझ्या सोनुल्या!!..मी कित्ती किती वाट बघते रे तुझी !!..तुझ्यासाठी स्वेटर विणलाय मी..ये ना माझ्या राजा स्वेटर घालायला !!कधी येतोयस रे सांग ना जानू??!!"

"अग ए बाई ...आता कमाल झाली तुझी !! तू काय मेंढ्या पाळतेस का?..नाही म्हणजे असे किती लोकांना स्वेटर फुकट करून गंडा घालतेस...चिकार झाला फालतूपणा !.गपचूप फोन ठेव चल !!"

"स्वीटू ..माय जानू ...प्लीज माय टेडी ..डोन्ट डू ईट माय चम्पू!! अरे अज्जू काय झालंय आज तुला !!"

"मी तुझा तो अज्जू का फाज्जू नाहीये ...कळल??"

"हा कल्याणचाच नंबर आहे ना ..अज्जू घरत बोलतोयस ना ??..मी सोनी बोलतेय !!तुझा मोबाईल बंद आहे म्हणून घरी फोन केला होता रे "

"आता फोन ठेव महामूर्ख मुली !!हा डोंबिवली चा नंबर आहे कल्याणचा नाही !!....आणी तुझा डियर का फियर मी नाहीये !!...आणि काय ग 'सोनी' , वाट्टेल त्याला फोन करून गणपतीच्या आणि लग्नाच्या धमक्या देतेस ??.....मगासपासून सांगतोय रॉंग नंबर असेल म्हणून, तर आचरट नावे घेत बोलाव्तीयेस मला....!!बेअक्कल मुली; काही लाज वगैरे आहे कि नाही ??फुकट डोक्याची भिंगरी केलीस माझ्या !!..परत जर मला तुझा फोन आला ना तर बघ !! आणि तुझा तो चम्पू ;स्वीटू कि जानू कोण आहे ना तो मला भेटू देत फक्त मग बघ ,त्याला नाय मेंढीसारखा कातरून त्याचाच स्वेटर बनवून तुला दिला तर नाव नाही सांगणार !! अग बये ;अभ्यास कर; काही नोकरी वगैरे कर;अगदीच काही जमलं नाही तर एकदाचं त्या "स्वीटू"का "फिटू" बरोबर लग्न करून एकदाची मोकळी हो ..लग्न त्याच झाडाखाली लाव जिथे तुम्ही भेटता !!..पण परत वाट्टेल त्याला फोन करून हैराण करू नकोस !!...बोलताना जरा अक्कल जागेवर ठेवत जा बये !!"..मी होतो  म्हणून  ठीक आहे एखादा दुसरा कोणी असता ना .तर लगेच  झाडाखाली भेटायला आला असता..मग कळल असत तुला..!!.जाऊ दे चल ठेव फोन !!"

[फोन कट झालेला असतो...मी घाम पुसतो ..आणि फोन ठेवून देतो ] 
 .......हा सत्यप्रसंग आहे ....



प्रसंग क्र.२ ...माझा उडालेला गोंधळ  


मे महिना २०१० ...वेळ-सकाळी सुमारे दहा वाजता 
चुलत आत्याचा फोन येतो 

"कसा आहेस हरषु??"

"छान आहे .तू कशीयेस?.घरून बोल्तीयेस का?"

"अरे हो रे बाळा;मला मेलीला म्हातारीला आता कोण आहे मुक्कामाला यायचा विचार करतीये आज संध्याकाळी निघेन हो "

"अग ये न मग !!.काल दादांचा फोन आला होता म्हणत होते तू येणारेस इकडे "

"त्याला काय होतंय सांगायला !..या वयात झेपत नाही रे आता.मी येणारे हो तरीही  "

"मी घ्यायला येऊ न कल्याणला ?"

"अरे तसं नव्हे रे .बघ मी सांगत्ये ते सगळे लक्षात ठेव हो नीट.मी संध्याकाळी बसेन गाडीत ..मग उद्या मधुकर येणारे घ्यायला .त्याकडे जाईन ठाण्याला .दुपारी निघेन तिथून आणि अप्पांकडे जाऊन येईन.मग रात्री परत मधुकडेच मुक्काम करेन.परवा सकाळी ताईकडे भेटून येईन. माझा मेलीचा उपास असतो ना मग ताईकडेच जेवेन हो.नंतर अष्टेकर आहेत न त्यांच्या मुलीला भेटून येईन म्हणते ..दुपारी चहा वगैरे झाला कि ताईच्या लेकाला घेऊन बाजारात जाऊन येईन ..मला मेलीला काय लागते ..पण चार चौघात बसायचे असते ना म्हणून खरेदी करावी लागते ..चार पाच जरीच्या साड्या घेईन म्हणते..!!.रात्री ताईकडेच मुक्काम करेन .मग तेरवा सकाळी महादेवाला जाऊन येईन ..अरे सोमवार ना म्हणून !!..परत उपास हो माझा !!..दुपारी जरा पडले कि नन्तर मग मावशीकडे जाऊन येईन ..मग रात्री तिथेच मुक्काम..मग पुढच्या दिवशी काय करायचे ते नंतर ठरवीन !!"


"अग आत्या तू आमच्याकडे कधी येणारेस ??तेव्हढच सांग न मला!!बाकी सगळं पुराण लक्षात ठेवून काय करू मी ??"


"अरे तुमच्याकडे येण्याचे तर अजून ठरवलंच नाहीये काही ...म्हणजे येणारे हो मी ..पण कधी, कसे, किती वाजता ,ते अजून नक्की नाही ..तुला उद्या फोन करेन न आजसारखा..!!तेंव्हा परत नीट सांगेन हं सगळं !!..अच्छा !!ठेवू फोन हर्षु ??..टाटा ..घरच्यांना सांग मी येतीये म्हणून..फोन करेन उद्या !!"

"अग मग आज जे लांबलचक सांगितलंस ते रामायण ;त्याचं काय??..मी कशाला एव्हढे सगळे लक्षात ठेवू ग आत्या ??.."


"चल ,माठ कुठचा !..आजकालची मुले न तुम्ही वात्रट झालायत बोलायला..मी सांगत्ये ते सगळ्यांना कळावे म्हणून हो..नक्की सगळे सांग हा !!..विसरला नाहीस ना माझा मुक्काम कसा आणि कुठे होणारे ते.??.का परत सांगू ??..तसं उद्या फोन करेनच परत !!..सांगू का तरी पुन्हा सगळे एकदा ??""


[प्रचंड घाबरून ]
"नको नको आत्या ;सगळे लक्षात आहे ;सांगतो मी "!!


फोन बंद होतो आणि मी सुटतो!!..अर्थात काहीच आठवणार नाही याची खात्री असते...'डोन्ट वरी 'मी स्वतःला म्हणतो..कारण उद्या परत आत्या फोन करणार आहेच..!!




..............................लेखन -हर्षल...





Saturday, November 12, 2011

.....शाळा आणि शिक्षा ..!!




"गाढवा ,निबंध लिहिलास का?"
"नाही बाई;विसरलो !"
"जेवायला विसरतोस का ?"
"नाही बाई;आई न विसरता जेवायला वाढते "
"उलट बोलतोस ?.लाज वाटते कि नाही ?"
"सॉरी बाई! "
"अंगठे धरून उभा रहा "
"उद्या लिहून आणतो न बाई ,न विसरता !!"
"अंगठे धरून उभा रहा !..फाजील कुठचा !!चल लवकर!!"
"हाताचे कि पायाचे ; बाई?"
"मुस्काड फोडू ??"
"नको.. धरतोय मी अंगठे .किती वेळ उभा राहू ;बाई?"
"तास संपेपर्यंत "


भर वर्गात एका मुलाचा पंचनामा झाला होता ..आणि समस्त वर्गासमोर अंगठे धरून,ते सुद्धा विशेषतः खिदळणार्या आणि गृहपाठ वेळेवर करून आणणार्या मुलींसमोर ;उभे राहायची वाईट वेळ एका हुशार मुलावर आली...

अंगठे धरून उभे करणे ;केराची बादली डोक्यावर घेऊन सगळ्या वर्गात फिरणे आणि "कचरा आहे का वर्गात ?"असे भिकार्यासारखे ओरडत त्या त्या वर्गातला केर गोळा करणे ;तोंडात हाताचा अंगठा  धरून प्रार्थनेच्या वेळी जमलेल्या अख्या शाळेसमोर स्टेजवर उभे करणे ;पार्श्वभागावर लाकडी फुटपट्ट्या बडवून चार पाच दिवस "बसण्याचे "
वांदे करणे ;तळहात त्याच लाकडी पट्ट्यांनी लाल करून सुजवणे;
अभ्यास केला नसेल तर सगळ्यात मोठ्ठा धडा{ शक्यतोवर मराठी विषयातला } दहा किंवा वीस वेळा लिहून आणायला लावणे ;पालक सभेला आई-वडीलांसमोर त्यांच्या दिव्य मुलाच्या "शालेय उनाडकीबाज कर्तृत्वान्चा" संपूर्ण पाढा वाचणे......या आणि अशा अनेक शिक्षा शाळेमध्ये मोठ्या सन्मानाने दिल्या जातात .आणि टवाळ विद्यार्थी मोठ्या समाधानाने आणि निधड्या छातीने त्यांना सामोरे जातात .

माझ्या शालेय आयुष्यात मला स्वताला फार कमी शिक्षा भोगाव्या लागल्या .
तीन वेळा मला अंगठे धरून उभे केले होते ;
दोन वेळा माझे हात सुजवले गेले होते;
तीन वेळा वर्गाबाहेर काढले होते.. [ आणि परत आमच्या बाइन्नाच वर्गाबाहेर काढलेल्या आणि गायब झालेल्या आम्हाला शोधायला अख्खी शाळा शोधावी लागली होती !!]  ;
चार वेळा आमच्या पार्श्वभागावर आमच्याच लाकडी फूटपट्ट्या अत्यंत तुफानी वेगाने आणि अगदी मनापासून झोडपण्यात आल्या होत्या {आणि मारून मारून पट्ट्या तुटल्यावर मगच आमची सुटका झाली होती };
तीन वेळा {आमचे कल्याण व्हावे ह्या शुद्ध हेतूने }पाठीत अतिशय शक्तीशाली व जबरदस्त बुक्के आणी दणदणीत रट्टे बसले होते ;
दोनवेळा ;कान वेडेवाकडे पिळले तर कसे दुखतात  ह्याचे प्रात्यक्षिक दाखवले गेले होते ;
एक वेळा कानाखाली वेगवान प्रहार झाल्यावर गाल आणी कान कसे  सुन्न होऊन सुजतात हे सुद्धा दाखवून दिले होते;
शिवाय  चौथी-पाचवीत असताना दोन वेळा मी शिक्षकांना चुकवून पळत असताना ;त्याच वेगाने पळत आमच्या मागे येऊन  हातातल्या पट्टीने आमच्या अर्ध्या-चड्डीवर मागच्या बाजूने जीवघेणा हल्ला झालेला होता ;
दोन वेळा मराठीचे सगळ्यात मोट्ठे धडे १० वेळा लिहून आणायला सांगितले होते ;
आणि नक्की आठवत नाही इतके वेळा ,टपल्या किंवा चिमटे काढणे किंवा हाताचे दंड पट्टीचा घणाघाती वापर करून  कलिंगडासारखे सुजवणे असे प्रबोधनात्मक प्रकार घडले होते;
आणि या शिवाय मग बडबड करताना दिसले तर लाकडी डसटर फेकून मारणे किंवा नेम धरून खडू फेकून डोक्यावर पांढरी नक्षी निर्माण करणे वगैरे इतर सौम्य शिक्षा तर होत्याच !!
   
तर एकंदर वरचे वाचून आपल्याला कळले असेलच कि मी किती निरुपद्रवी विद्यार्थी होतो!!
..शाळेत इतक्या कमी प्रमाणात शिक्षा मला झालेल्या असल्याने मी कदाचित ८वी ;९वी आणि दहावीत आदर्श विद्यार्थी म्हणून निवडला गेलो असेन...!!
..गमतीची गोष्ट अशी कि मी आठवीत असताना ज्या दिवशी आमचा बक्षीस समारंभ होता आणि मला आदर्श विद्यार्थी म्हणून बक्षीस मिळणार होते आणि त्याच्याच आदल्या दिवशी रंगीत तालमीला उशीरा पोहोचल्याबद्दल  व तालीम करण्याच्या नावाखाली तासभर मित्रांबरोबर  रिकाम्या वर्गात कबड्डी 
खेळण्याच्या महान पराक्रमाबद्दल मी अर्धा तास अंगठे धरून उभा होतो व तत्पूर्वी पार्श्वभागावर आनंदाने केली जाणारी 'अत्यंत तुफानी'  अशी खास "फुटपट्टी treatment" सुद्धा व्यवस्थित पार पडलेली होती....

मजा असते नाही शाळेत आणि त्यातल्या शिक्षांमध्ये ??!!!


--------------------------------लेखन - हर्षल !!

Friday, November 11, 2011

...माझी रचना-वही (डायरी)...!!

माझी डायरी [रचना]

...जिच्यावर मी मनापासून प्रेम करतो आणि जिने आजवर माझ्याकडून एका लेखणी-शिवाय कसलीही अपेक्षा ठेवली नाही....

जिच्याकडून आनंदाशिवाय आणि समाधानाशिवाय अन्य काही मिळवण्याची अपेक्षा मी ठेवली नाही......

मला माझेच विचार ; स्वताच्या शुभ्र अंगावर जीने लिहू दिले....

मला आयुष्याच्या आजवरच्या प्रवासात सुख-दुःखाच्या सगळ्या क्षणी जिची आठवण आणी साथ सतत राहिली .....

स्वतः जीर्ण होऊन सुद्धा माझे मानसिक जीवन जिने नेहेमी टवटवीत ठेवले .. 

जिच्या प्रत्येक अंगावर माझा एकेक काळ;एकेक क्षण रुजलाय 
;माझी एकेक स्मृती आनंदाने अजून तिच्यामध्ये खेळतेय ..

मला आठवणार देखील नाही असा मीच जगलेला जुना काळ मला परत पहायचा असला कि जिच्याशिवाय मला कोणाचीही आठवण होत नाही....

जी मला वेळोवेळी माझेच बदलते स्वरूप दाखवते ..माझ्या मनाचे आणी उन्नतीचे बदललेले स्तर ;माझ्या त्या-त्या वेळच्या विचारांचे जिवंत रूप ;जी मला हसतमुखाने दाखवून देते.....

माझ्यातल्या "मला" व्यक्त करण्यासाठी "जिने" मला असीम बळ 
दिले ..आणी माझे राग;लोभ;द्वेष;आनंद;प्रेम;समाधान सगळे सगळे विनातक्रार स्वीकारले ...नुसते स्वीकारलेच नाही तर जपून ठेवले..अगदी मायेने ..!!

त्या आजसुद्धा माझ्याबरोबर असलेल्या माझ्या लेखन-वहीस "डायरीस"....ही स्नेहांजली !!  

----------------------------लेखन --  हर्षल..

.........सागराच्या तीरावर ........!!

सागर-शिंपला
उंच माडांच्या वनांमधून ;वाळूच्या बेटांवर समुद्राच्या साक्षीने एकेक 
 पाउल पुढे चाललोय मी..बाहेर डोळ्यांत न मावणारा अथांग 
 महासागर आणि मनात तसाच अथांग प्रश्नांचा अमर्याद समुद्र !! ...

चालता चालता पाय अचानक थांबतात ....
एक कळ मस्तकात जाते ..आणि एक मोठ्ठासा तुटलेला टोकदार कठीण शिंपला तळ-पावलात गेलेला दिसतो ..
फारच  कठीण आणि धारदार आहे तो शिंपला...पाउलच  कापलं जायचं एखादवेळ पण नुसत्या बारीक जखमेवर निभावलं! नशीब !!

....तो जखम देणारा शिंपला मी उचलून बघतोय ..अर्धा तुटलेला आणि तरीही सुंदर दिसणारा ... राज-हंसाचा शुभ्र रंग सकाळच्या पिवळसर केशरी किरणांच्या कुंचल्याने परमेश्वराने त्यावर जणू उतरवला होता..आणि बारीक बारीक वळणे घेत जाणारे विवरासारखे नक्षीकाम करून पाठवले होते त्याला या जगात ....

तो शिंपला फारच सुंदर असेल कधीतरी ...कुणीतरी लहानसा जीव राहत असेल त्यात ;त्याला घर समजून .कदाचित या समोर पसरलेल्या  प्रचंड समुद्राच्या अतिगहन विस्तीर्ण तळामध्ये कित्येक काळ पहुडला असेल हा !!..कदाचित स्वातीचे नक्षत्र देऊन गेलेही  असेल त्याला एखादा अमूल्य मोती !! मला मनातच ईतिहास दिसू लागला त्या शिंपल्याचा...!!...हा सुंदर मोठ्ठा शिंपला किती दिमाखदार असेल नाही त्यावेळी !...आज अर्धा मुर्धा उरलाय तरी ईतका सुंदर दिसतोय ..!!

तो शिंपला रिकामा आहे..अर्धाच उरलाय ..एकटा जगतोय !!
..आता परत त्याला कोणाचे घर होता येणार नाहीये ..!
..आता परत हस्तापासून स्वातीपर्यंत कुठलेच नक्षत्र आपले मौक्तीकांचे दान त्याला देणार नाहीये!
..आता परत कुणी त्याला हौसेने हातात घेऊन बघणार सुद्धा नाहीये!
..समुद्र सुद्धा आता त्याला पोटात ठेवायला तयार नाहीये..! 

.........तो शिंपला समुद्राच्या किनार्यावर असाच तुटलेल्या अवस्थेत पडून राहील कदाचित ..अजून पार तुटून जाईपर्यंत..एकाकी !!..त्याला बिचार्याला बोलता येत नाही ना;म्हणून मला टोचून खुणावत असेल बिचारा !!..सगळीच दुःखे सगळ्यांनाच बोलून नाही सांगता येत ..आपणच समजून घ्यायला हवीत ..नाही का ?


मी तो अर्धा शिंपला हातात घेतलाय ; अर्धा असून सुद्धा माझ्या  हाताच्या तळव्यावर जेमतेम मावतोय तो...मी त्याला असाच एकटा किनार्यावर सोडणार नाहीये ..स्वातीचा थेंब पडणार नसला म्हणून काय झाले !! ..पण माझ्या अश्रुंचा थेंब नक्कीच त्यात पडलाय!!
अर्थात त्यातून एखाद्या सुंदर मोत्याचा जन्म नाही होणार हे नक्की!  ..पण त्या शिम्पल्याला समाधान तरी मिळेल;कळेल त्याला कि अजून तो अगदीच एकटा आणि मित्रहीन झालेला नाहीये ;उलट मोत्याची भेट न देऊन सुद्धा आपल्यावर प्रेम करणारा एक खरा मित्र मिळालाय !!

.......एक मनस्वी मित्र त्याला मिळेल आणि एक प्रामाणिक मित्र मलाही !!




-----------------------------------लेखन ---हर्षल
                                     दि-११\८\२०००

Thursday, November 10, 2011

!!....परमेश्वराबद्दल...!!



!!!आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम !सर्व देव नमस्कारान केशवं प्रती गच्छति !! 

लहानपणी कधीतरी ओठांतून नुसतेच उतरून गेलेले आणी आता हृदयात शांत बसलेले हे सुंदर संस्कृत वचन.!.

मी आज लिहायला बसलोय कारण आज ईतर काहीच उमटणार नाही याची खात्री आहे.माझ्या प्रश्नाची उत्तरे मी देवाशिवाय कोणाला मागत नाही.आणी शिवाय प्रसंगच मला देवाला प्रश्न विचारायला भाग पाडत असतात .'जीव' स्वतःहून 'शिवा'ची भक्ती करत नाही.पण अतृप्ती आणी धर्मजिज्ञासा त्या जीवाला ईश्वराकडे वळवते.आणि पुढे जीवच स्वतः शिव असतो हे त्याला सत्य अर्थाने जाणवते.असो.

मी माझे आणि ईश्वराचे संकेत येथे लिहू शकत नाही.कारण मला जे ईश्वरत्व दिसले तसेच ते सर्वांना जाणवेल असे नाही.परंतु जे मला जाणवले ते माझ्यापुरते आणी माझ्या अस्तित्वासाठी सत्य असेल असे ईतरांनी समजून घेण्यास हरकत नाही.मी तेव्हढेच लिहू इच्छितो.

परमेश्वराचे नाम मी कधी प्रथम ऐकले असेन ते स्मरणात नाही.परंतु त्याने मात्र माझ्याआतून आणी बाहेरून मला बरेच सहाय्य केलेले दिसते.देव आणी त्याचे देऊळ यांकडे जाणारा मार्ग हा भक्तांच्या हृदयातून जातो हे मात्र मला बर्याच अंशी पटलेले आहे.

"भाव तिथे देव" हे अक्षरश: सत्य आहे ह्याचा साक्षात्कार होऊ शकतो हे सुद्धा मला मान्य झाले.भक्तांशीवाय देवाला आणी मनुष्याशीवाय धर्माला परीक्षक अन्य कोणी नसतो.सनातन वस्तूंना सुद्धा व्यक्त होण्यासाठी व्यक्त वस्तूंची मोजपट्टी लागते.आणि व्यक्त वस्तू ह्या अव्यक्त ईश्वराचेच सगुण अवतार आहेत ;किंबहुना व्यक्त आणि अव्यक्त हे एकत्रच असतात ह्याचे ज्ञान तद्नंतर प्राप्त होते.

आपल्याला काळाच्या विस्तीर्ण पटावर अलगद उतरवणारे आणी देह ,मन आणी ईतर वासनांचे आभास प्राप्त करून देणारे अव्यक्त तत्त्व काय असावे हे शोधण्याच्या प्रयत्नात तत्त्वद्न्यांचे जथेच्या जथे ;प्रज्ञावान ऋषीचे समुदाय आणि मुमुक्षु मानवांचे समूहच्या समूह उत्पन्न होत गेले आणि होतील सुद्धा !..परंतु ईश्वरत्व ही अत्यंत आत्मकेंद्रित आणी व्यक्तीसापेक्ष जाणीव आहे.आणि म्हणून लक्षावधी संत जरी जन्माला येऊन उपदेश करून गेले तरी परमेश्वर ज्याला समजायचा त्यालाच समजतो !....

समर्थांनी त्यांच्या चाफळ मंदिराच्या उत्सव गीतात अंतिम चरणात सांगीतलय .
   "दास डोंगरी रहातो ! यात्रा देवाची पहातो !
   "देव भक्तासवे जातो !  ध्यानरुपे  !"
"देव भक्तासवे जातो ,,ध्यानरुपे !!"...हे वाक्य माझ्या "मर्मबंधातली ठेव "आहे .!! मनात अथांग प्रेम भरून येते त्या उदात्त कल्पनेबद्दल !!..

देव आणि भक्त हे , ईश्वर आणि मानव  किंवा पूज्य आणि पूजक अशा बाह्य द्वैत संबंधांवर संपून जाणारे प्रकार नव्हेत ..ते अखंड चालू असतात किंवा असे म्हणूयात कि ,जर ते अखंड एकमेकांशी संलग्न असतील तरच ती "खरी भक्ती "!.आणि फक्त असेच भक्त ,एकनाथ महाराजांसारखे म्हणू शकतात "..भक्तांचिया चिंता क्षण एक न साहवे ,भगवंता!" किंवा "बहुत सुकृताची जोडी ;तेणे विठ्ठली आवडी "!असे मनापासून सांगण्याचा अधिकार अशा भक्तांनाच आहे.!

देवाचे उपकार थोर असतात ..आणि त्याचे उपकार नक्की आहेत कसे हे उमगणे त्याहून थोर असते.
आणि नवविधा भक्तीन्पैकी ईश्वराचे "नामचिंतन" करणारी भक्ती सध्या कलि-काळात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ असे अत्यंत थोर योग्यांच्या आणि अवतारी महात्म्यांच्या आशीर्वचनावर आणि स्वानुभवावर विसंबून मी आयुष्य जगतोय! हे ईतके तरी मला उमगले हेच माझे भाग्य असेल कदाचित !किंवा ईश्वराची कृपा असेल !   

परंतु मुळात देव कसा असतो आणि त्याचे अस्तित्व असते कि नसते ह्या विषयावर अफाट आणि अथांग ग्रंथसंपदा विश्वात निर्माण झालेली आहे. तत्त्वज्ञान आहे ;धर्मवाद आहेत ;शास्त्रे आहेत;विचारग्रंथ आहेत;मोठ-मोठी चर्चा-सत्रे आहेत;अजस्त्र असणारे आणि आश्चर्यमुग्ध करणारे इतिहास ,संस्कृती आहेत .अपरंपार माहिती पसरलेली आहे सर्वत्र!..हे सगळे ज्ञान स्त्रोत बुद्धीगम्य असतील व नसतील सुद्धा !!..आपण सगळेच जगताना; आपणही ह्या कालप्रवाहातच असल्याने या सगळ्या गोष्टींचे भान ठेवत आणी जमेल तितके समजावून घेत मार्ग क्रमित असतो..आणि ज्ञान किंवा विविध शास्त्रांची माहिती म्हणूयात ,ती घेण्यातच स्वतःची प्रगती मानतो ;अहंकार पोसतो;आणि एके दिवशी स्वतचे सारे पसारे सांडून अकस्मात निघून जातो..आपल्यामागे आपलेच आपल्यासारखेच वंश जिवंत ठेवून !! 
आणि आश्चर्य म्हणजे आपण मरणार आहोत हे आपल्याला कधीच खरे वाटत नसते .ईतरांना मृत्युपंथास जाताना आपण पाहतो परंतु त्यावेळी आपण जिवंत असल्याने मृत्यूची कल्पना आपल्या मनाला स्पर्श करत नाही !.
हे आपले भ्रमात्मक पण आपल्यासाठी खरेखुरे असलेले "मानसिक अमरत्व"आपल्याला दुखान्पासून दूर ठेवते परंतु त्याच बरोबर एक शाप सुद्धा देते ,तो म्हणजे सत्याकडे पाठ फिरवून मोहाच्या खोल गर्तेत कायम चालत जाण्याचा.!!

"मरे एक त्याचा दुजा शोक वाहे !अकस्मात तोही पुढे  जात आहे "

ईतके जरी एखाद्यास समजेल तरी तो किमान भानावर तरी येईल!!..अन्यथा रावणासारखे आपलेसुद्धा होतेच आहे ...
      "मना सांग बा,रावणा काय झाले 
       अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले !" 
समजले पाहिजे !!...आणि "समजणेच "सगळ्यात अवघड आहे.!!

मला ईश्वरानेच घडवले असेल;किंवा काळाने प्रत्येक कर्म प्राक्तनानुसार मजकडून घडवले असेल;किंवा मी जे काही चांगले अथवा वाईट ;काळात अथवा नकळत वागलो असेन ते माझ्या स्व-मतीनुसार आणि सभोवतालच्या प्रसंगान्सापेक्ष वागलो असेन;किंवा निसर्ग नियमाप्रमाणे मी जगात येऊन जगत राहिलो असेन ;अथवा शारीरिक क्रियांचा किंवा मानसिक [मेंदूच्या म्हणा हवे तर !]क्रियांचा परिपाक म्हणजे
माझे जीवन असेल .......काहीही असो.!!

..किमान आजवर किंवा आत्ता तरी जितके मला समजले त्यावरून मी एक निश्चित सत्य मानतो कि ,ईश्वराने मला तारून नेले व प्रत्यही नेत आहे.
मी देवाला सांगितले कि त्याला ऐकू जाते अशी जोवर श्रद्धा माझी राहील तोवर तो ऐकतो ह्यावरचा माझा विश्वास सुद्धा अभंग असेल!!..तो कसा ऐकतो आणि कसा कार्य करतो ह्यावर तत्त्वज्ञांची मते अनेक असतील ;काही मी देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला ;परंतु ईश्वराचे अस्तित्व समजण्यापेक्षा त्याची कृपा अनुभवण्याचा स्वार्थ माझ्यात अधिक आहे असे आजवर तरी मला जाणवले!.

.माझी परमेश्वराला परमेश्वर मानण्याची उर्मी आणि श्रद्धा जोपर्यंत सात्विकपणे जिवंत राहील आणि जोपर्यंत ईश्वराला मी ;त्याला न ओळखता सुद्द्धा भक्तीभावाने पाहात राहीन तोपर्यंत तरी चिंतेचे कारण काहीही दिसत नाहीये !! 
शेवटी "देव भक्तासवे जातो...ध्यानरुपे ",,हेच खरे !!..ईश्वर माझ्या अगदी संनिध ;अगदी जवळ आहे आणी माझे ऐकतो आहे ह्यापेक्षा मोठे सुख मला काय वाटावे!!..माझ्या अज्ञानी मनाला जोडलेला देवाच्या अस्तित्वाचा हा भक्तीमय शुद्ध दुवा मला प्रत्यक्ष देवाशी बद्ध करत असतो हेच माझे पुण्य असेल !! 


मला ईश्वराची व्याख्या करता येत नाही ;परंतु ईतके तरी नक्कीच सांगता येते --
""जो अगम्य असूनही भक्तीरूपाने भक्तांच्या हृदयात आणि त्यांच्या आयुष्यात सर्वत्र साक्षित्वाने भरून  राहिलेला असतो तो म्हणजे परमेश्वर !!""
स्वतः भगवंत सांगून गेलेत नारदास .." मद्भक्ता: यत्र गायन्ति तत्र तिष्ठामी नारद !!" म्हणजे 'हे नारदा ,जेथे माझे भक्त मला आळवतात तेथेच माझा निवास असतो "..!!
एकच सांगावेसे वाटते कि ;देवाला आपण माणसे कशी आहोत हे चांगलेच आणि संपूर्णतः ठाउक असते ;परंतु आपल्यालाच ईश्वर ठाऊक नसतो ;आणि त्याला भक्तीने आणि ज्ञानाने समजून घेणे ह्यासाठी आपला सगळा प्रपंच आणि खटाटोप हवा !!...थोडक्यात काय सगळे उपभोगुन जगावे परंतु सतत परमेश्वराला साक्ष ठेवून ;त्याकडे पाहत !!....देवाकडे पाठ करून जगलो कि नुसता स्वार्थ पसरलेला दिसेल आणि देवाकडे तोंड करून जगलो कि परमार्थ हाच स्वार्थ होईल !!

आमच्या सद्गुरू श्री.गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात एक फार सुंदर उपमा त्यांनी दिलीये ..
ते म्हणतात "परमेश्वराचे अनुसंधान [म्हणजे सतत चिंतन आणि साधना ] प्रपंचात कसे असावे तर एखाद्या शालीन;कुलवती स्त्री सारखे !!..ज्याप्रमाणे ती स्त्री अनेक कामांमध्ये कधीही आणि कितीही व्यस्त असली तरी तिचे तिच्या पदराकडे जसे नकळत पण सदैव लक्ष असते . अगदी तसेच आपण कुठल्याही कर्मात असलो तरी आपले भगवंताच्या नामाकडे सतत जागृत लक्ष असायला हवे.!"  

अजून काय सांगू ??....

"संताची उच्छीष्ठे बोलीतो उत्तरे ;काय म्या पामरे बोलावे !"

.................................लेखनसीमा...............

-------------------------------------------लेखन - हर्षल !!

Friday, November 4, 2011

शुद्ध मराठी .......part 1 comedy !!

मराठी शुद्ध बोलावे असे म्हणतात ..परंतु मराठी शुद्ध बोलले तर मराठी माणसांनाच कळणार नाही ,अशी परिस्थिती आज आहे...उदाहरणादाखल काही प्रसंग देतोय !! मराठी लोकांना शुद्ध मराठी वाचताना अडचण येऊ नये ,{ कारण मराठी लोकच मराठी शब्दांचे अर्थ विचारताना दिसतात ही जबरदस्त(?) वस्तुस्थिती आहे सध्याची !!} म्हणून काही व्यावहारिक शब्द कंसात दिले आहेत आणी तेच शब्द आपण सर्रास वापरत असतो ,परंतु मूळ मराठी अगदी शुद्ध बोलले तर काय होईल यावर हा एक प्रकाश..!!!


प्रसंग १ :-- ..............संतती-नियमन ..........  [  शुद्ध मराठीत]


\\\\\\\\\\ \\  दोन  विद्वान बोलतायत ...

"सविनय प्रणाम ,श्रीमान तात्या ;कसे चालू आहे ?"

"उत्तम ;शास्त्रीबुवा .अतिउत्तम !!..आपण कसे आहात ?आपली प्रकृती कशी आहे आता?"

"आम्हास काय धाड भरली आहे!..आम्ही अत्यंत कुशल व आनंदमय आहोत!..आपलीच पृच्छा करावयास दस्तूर खुद्द येथे आलो.आपणास अपत्य प्राप्ती झाल्याचे वर्तमान ऐकले आणी थेट गृह निर्गमन केले [घर सोडले]..कसे आहे आपले पाचवे अपत्य ??"

"अत्युत्तम आहे .ईश्वरेच्छा बलीयसी ,शास्त्रीबुवा !.या समयी मात्र आधीच्या चार खेपेप्रमाणे नैसर्गिक जन्म अशक्य होऊन उदर-शस्त्रक्रिया करावी लागली आमच्या सौभाग्य्वतीन्च्ची..[सीझर!].बालक उत्तम आहे व बालकाची माता देखील स्वस्थ आहे तथापि शस्त्रक्रियेचा क्षीण अद्याप आहेच.तात्पर्य आमची अर्धांगीनी अद्याप प्रसूतीगृहातच विश्रामबद्ध आहे !!"


"अरेरे ,ह्या स्त्रियांस किती दुसःह वेदनांस सामोरे जावे लागते प्रसुतीसमयी !..आम्हास तर दया येते ह्या माउलींची ..नारीच्या वेदना नारीच जाणे !..परंतु तात्या आता आपणास ही हे अवगत व्हायला हवे कि ;सांप्रत काल हा 'अष्टपुत्रा' मातांचा नसून 'एकपुत्रा' अथवा ;'द्वीपुत्रा'.मातांचा आहे.परंतु आपली कृत्ये पाहता आपण लवकरच आपल्या पत्नीस अष्टपुत्रा कराल असे भय वाटते !!"



 "अहो बुवा; आम्ही काय आमच्या अर्धान्गीनीस "अष्टपुत्रा "करणार? ..आता या समयी किंचित ब्रह्म-घोटाळा घडला हे खरे ,आमचे संतती-नियमन अकस्मात संकटात आले हेच खरे !..अन्यथा चार अपत्यांननंतर पाचवे शेंडेफळ आजच्या 'अर्थ-व्ययी'[म्हणजे महागाई च्या ] परिस्थितीत संगोपीत करणे म्हणजे अत्यंत कष्टमय कार्य होय..!!  


"अहो मग ईतके असून असे कृत्य घडवलेतच का ?..हा घोटाळा संतती-नियमनाचा नसून मनोनिग्रह आणि मानसिक संयम नसल्याने उत्पन्न झालेला असा जटिल घोटाळा आहे..!आपणास हे कळावयास हवे होते तात्या .!!"

"अहो विकारातून बुद्धी नष्ट होते आणि त्यातून संकटे उद्भवतात !..मनोनिग्रह कमी पडला !..ईश्वरेछा ,दुसरे काय ?"

"असो,आता झाले ते झाले ;परंतु अजून ईश्वरास अधिक ईच्छा करावयास लावू नका ..आणि अपत्यांची संख्या वाढवू नका!!..नाहीतर काही समयपश्चात अपत्यांची संख्या ,अष्टवसुनप्रमाणे आठ  अथवा 
नवग्रहानसारखी नऊ अथवा दशदिशानसारखी दहा अथवा एकादश रुद्रानसारखी अकरा होण्याचा ज्वलंत संभव आहे..!..मनावर ;वासनेवर संयम हवा तात्या ;अशी अपत्यांची मालिका आजकाल कोणी निर्माण करते का ??..पत्नीचा विचार करावा !!..ब्रह्मचारी रहा आता ..पुष्कळ झाली पाच बालके !!कसे संगोपन कराल इत्क्यांचे ??..पुरुषांस ठीक आहे ;निशा समयास पत्नी बरोबर प्रेम्कृत्य करताना देहानंद लाभतो;परंतु त्याचे असे अनिष्ट परिणाम होतात आणी स्त्रियांस नऊ मास एक लहान जीव पोसावं लागतो.विचार करा तात्या ;काही कालांतराने लोक चेष्टा करतील हो तुमची !म्हणतील म्हातार्यास ईतकी अपत्ये आहेत कि ,त्यासच ठाऊक नाही  !! संयम बाळगा संयम ..आमच्यासारखा  !!"

  
"नक्की शास्त्री बुवा !! संयमाचे नक्की स्मरणात ठेवेन !!..अहो पण एक विचारायचे राहूनच गेले ; आपली 'सातवी' आणी शेवटची कन्या सांप्रत काय करते आहे ??;चतुर्थ ईयत्तेमधे होती असे श्रवणात होते!.आपण देखील माझ्या वास्त्पुशीत ईतके व्यग्र झालात कि क्षणभर आपणास स्वतःच्या सात गोंडस आणी मेधावी बालकांचा देखील विसर पडावा ,होय न ? खरच आपला विवेक आणी संयम अप्रतीम आहे,आपण आपल्या पत्नीस अष्टम अपत्यासाठी सक्त विरोध केला असाल !!..म्हणून केवळ सातच अपत्ये झाली आपणास !!किती महान !!
..आपल्याला जो संयम 'सात' बालकांच्या जन्मानंतर आला तो मात्र अवर्णनीय आहे हे अगदी सत्य आहे हो .!!परंतु आपली सात बालके एकदा सपत्निक घरी घेऊन याच शास्त्रीबुवा !!..म्हणजे संयमाचे जिवंत उदाहरण प्रत्यक्ष दिसेलच आम्हास !!..आणि त्यातून काही संतती-नियमनाचा बोध ही घेता येईल !!..काय म्हणता ;होय कि नाही??"

[शास्त्रीबुवा गोरेमोरे होऊन काहीतरी कारण सांगून  पलायन करतात ]


..............................................लेखन --हर्षल

Tuesday, November 1, 2011

देशस्थ आणि कोकणस्थ [भाग ४]==[ माझा दृष्टीकोन ]

प्रसंग क्र.१ :
स्थळ :माझे घर ..डोंबिवली 
विजयादशमीच्या आधीचा दिवस                 वर्ष २०१० 
वार्षिक देणगी घेण्यासाठी समितीचे कार्यवाह आणि ब्राह्मण सेवा संघाचे ज्येष्ठ सभासद श्री.अप्पासाहेब कुलकर्णी घरी आलेत ..वय सुमारे ६५ !! 

"अलभ्य लाभ देशपांडे!!;ओहो हा सावरकरांचा फोटो ना?..आणि ते बाजूला "लोकमान्य "का?.."

"हो ..पण अप्पा; असे बाहेरच काय उभे आहात ?..घरात तर या..!"

"हा बघ आलोच आत..हं,अरे काय रे किती फोटो लावलेस दाराजवळ चक्क दोन??,आणि समोर कोण आहे? हं ..हनुमान वाट्त??;धन्य आहेस!!"

"अप्पा;अजून आत गेला नाहीत म्हणून ,तिकडे अजून आहेत..!!"

[ घरात फिरून झाल्यावर ]

"छान रे देशपांडे,घरभर फोटो !!..मोजले मी,८ आहेत!!..रामदास स्वामी काय,सावरकर काय .टिळक काय,शिवाजी महाराज काय ..!!..""

"अप्पा; अहो ते दुर्मिळ आहेत असे फोटो मिळवून लावलेत मी..आता हाच बघा सावरकरांचा ;मुद्दाम दादरला सावरकर सदनात जाऊन आणलाय.."

"कोकणस्थ ;देशस्थ सगळे अगदी एकजीव झालेत तुझ्या घरात!!"

"मी असे भेद काही क्षुल्लक व्यावहारिक गोष्टी सोडल्या ;तर मानत नाही अप्पा! "


"अरे पण स्वभाव भेद असतातच ;ते कसे नाकारणार ?.."


"अप्पा;स्वभाव भेदांचे भांडवल करून संपूर्ण ब्राह्मण समाज मूर्खासारखा वागतोय..नुसता ब्राह्मणच नव्हे तर अक्खा भारतीय समाज !!"


"अरे जाती काय आपण निर्माण केल्या ??..त्या झाल्या !!"


"अप्पा,आपल्या नकळत जे झाले ते तसेच चालू ठेवावे असा काही नियम नाहीये !आणि जाती ;पोटजाती ह्या काही कल्याणकारी काम करतायत का?.नाही..उलट प्रत्येकाचे खोटे अभिमान ;घमेंड ;मत्सर हेच दिसतंय !!..ब्राह्मण हा वर्ण होता तो विद्वत्तेचा आणि निस्वार्थी असणार्या ;निष्ठावान माणसांचा ..!!ह्या जातीभेन्दान्पायी हा वर्ण  नामशेष होतोय ..भाषेच्या आणि जातीच्या भिंती धर्माचा नाश करतात !!"

"अरे पण स्वभाव वेगळे म्हणून तर जातींना महत्व आहे..शिवाय जाती एकदम नष्ट करणे जमणार कसे?"


"अप्पा;माझा देशस्थ ;कोकणस्थ ;कर्हाडे ईत्यादी जातींना विरोध नाहीये..प्रादेशिक नावे आहेत ती ;शिवाय काही सगोत्र आणि समान संस्काराचा वारसा आहे या जातींना ,हे सुद्धा अमान्य नाहीये मला.परंतु आपापले जन्मजात स्वभाव म्हणजेच आपले ब्राह्मणत्व असे भयंकर घातक समज आता रूढ झालेत ह्या पोटजातींमध्ये!! ह्या उपजाती फार लहान स्तरावर राहायला हव्यात अगदी घरापुर्त्या ;आणि काही परम्परांपुर्त्याच ..रूढी किंवा परंपरा एव्हढेच जर भेद असतील तर ते आपणच मिटवायला नकोत का ??...त्यासाठी एक अक्खा ब्राह्मण वर्ण जाळून टाकायचा?..मी कोकणस्थ ;मी देशस्थ वगैरे म्हणत अशा जाड भिंती उभ्या केल्यात आपण कि आपल्याच लोकांना आपण सगळे एकच आहोत हे समजत नाहीये!!..रंग;जन्मस्थान आणि जन्मप्रदेश ही जातींची वैशिष्ठ्ये असतील तर असू द्यात ;परंतु
'ब्राह्मण वर्णाची ' ही वैशिष्ठ्ये नव्हेत !!..जो पर्यंत ब्राह्मण हे तत्त्व समजत नाहीत तोवर ते नुसतेच नावाचे ब्राह्मण !!..असे ब्राह्मण स्वतच्या आवडी निवडी ;स्वताचे जगण्याचे नियम आणी प्रथा यांनाच कुरवाळत बसतात आणि यालाच ब्राह्मणत्व समजतात ,आणि वर म्हणतात "आम्ही अमुक अमुक ब्राह्मण आमचे अमुक अमुक नियम;आमचा अमुक अमुक स्वभाव.."..हे सगळे बघितले कि पूर्वी मस्तकात संतापाचा स्फोट व्हायचा माझ्या ;रक्त तापून निघायचे माझे ;आता मात्र मी ह्या माणसांची कीव करतो..आणि माझी सुद्धा लाज वाटते मला ..मी तरी काय करू शकलो ??अपयशाची कारणे देणे योग्य नाही पण खरच मी काही वेळा प्रयत्न करून पाहिला पण समजत नाहीये कोणाला ;कधी माझे लहान वय तर कधी अजून काही ;अडचणी उभ्या राहिल्याच संवादामध्ये ! कुठल्या बाह्य परिस्थितीत आपण आहोत,हा आपला समाज कुठे चाललाय ह्याचे काडीमात्र भान नसल्यासारखे सगळेच आपापल्या मस्तीत स्वार्थ कुरवाळत बसलेत !!..स्वार्थ ;कूपमंडूक वृत्ती आणि संकुचितपणा यासारखे अन्य शत्रू नसतील कुणी !!आणि याच शत्रूंच्या तडाख्यात आमचे ब्राह्मण स्वतःच्याच धुंदीत अडकून मजेत जगतायेत;यासारखे अत्यंत घातक दुर्भाग्य अजून काय असेल !!विष जहाल  असते असे म्हणतात ;सैतान भयानक असतो असे म्हणतात परंतु तसे अजिबात नाही ;मुळात विष हे गोड आणी बेधुंद करणारे असते आणि सैतान बाह्य रूपाने अत्यंत आकर्षक असतो ;त्याशिवाय ह्या दोन्ही गोष्टी लोकांना आवडतील कशा..??..त्यांचीच तर मोहिनी पडलीये आज सगळ्यांवर ;ती काय उगाच?? आपल्या लोकांमध्ये हे विषासारखे अवगुण आणी सैतानी स्वार्थ लोलुपता कशी पसरलीये ते बघा म्हणजे समजेल सगळे !! "  




[[ वाचकांसाठी सूचना :---लेख अजून बराच बाकी आहे...पण लिहायला बसलो कि उत्साह मावळतोय ..असो..बरच काही येणारे पुढे..जरा मन स्वस्थ आणी शांत झाल्यावर लिहेन ..तोवर ईतकेच गोड मानून घ्यावे ही विनंती ...हर्षल ]]

Sunday, October 30, 2011

देशस्थ आणि कोकणस्थ भाग ३ [भांडण]..!!

प्रसंग ४:- उग्र  मतभेद!!
स्थळ :पुणे शहरामधील एक वाचनालय          :-२००५ चा जुलै महिना    वेळ :- सकाळी
                                                   सुमारे ११ची !
{ **एक देशस्थ [श्री.अत्रे] आणि एक कोकणस्थ [श्री.गाडगीळ] दोन मित्र(?) एकमेकांना भेटलेत   ..}

"काय म्हणतोस अत्रे बर्याच दिव्सांने भेटलास?.कधी घरातून बाहेर पडत जा ;वाचनालयाला ईतकी फी भरतोस आणि पुस्तके बदलायला अगदी क्वचितच येतोस!!..थोडा हिशेब तरी ठेव..हेहेहे "



"ओहो गाडगीळ !!कसा आहेस ?..कसले हिशेब ?..चायला मी हिशेब करावे ;फी वसूल  करावी
 म्हणून लायब्ररी नाही वापरत...चांगली पुस्तके वाचण्याचा छंद आहे म्हणून लावतो ;तुमच्यासारखे वसुली बाज लोक नाहीयोत आम्ही !!साला ..सगळीकडे फक्त फायदा आणि वसुली काय रे बघता ?मन शुद्ध कर आधी ;आणि कसली फडतूस पुस्तके वाचतोस गाडगीळ तू !!..आणि ह्याला वाचन म्हणतोस;वसुली म्हणतोस ??..टीनपाट खोपडीच्या!!""  




"साहित्याची आवड म्हणतात त्याला ;देशस्थांच्या डोक्याबाहेरची गोष्ट आहे ती !!..आणि टीनपाट कोणाला म्हणतोस रे अक्करमाशा ?..चित्पावन म्हणजे काय तुमच्यासारखे मट्ठ नाहीयेत !..उच्च विचार आणी समर्पक व्यवहारी आचार  म्हणजे चित्पावन ;म्हणजे आम्ही!! ;कळले का रे काळपट माणसा ??"


"चायला ..उच्च विचार ??साहित्याची आवड ?? ते पण तुमच्याकडे ?अरे, पांढरट पोपटनाक्या;साहित्य म्हणजे काय ते माहितीये तरी का,चीचुन्द्र्या ?? घार्या डोळ्यांवर चष्मा लावून आणि सडपातळ अंगात झब्बा घालून चीचुन्द्रीसार्ख्या आवाजात गाण्याचे प्रोग्राम केले कि लगेच स्वतःला साहित्यिक म्हणवता तुम्ही ??..थापा पुण्याबाहेरच्या लोकांना मार रे !! तुमच्या सगळ्या आवडी माहितीयेत मला ;समर्पक आचार म्हणे !! काहीही म्हण गाडगीळा ;कोकणस्थ चित्पावन म्हणजे फुल भंकस पब्लिक रे तुम्ही "


"अहो मिस्टर व्यवस्थित म्हणजे भंकस पब्लिक काय;.आणि गाणे म्हणायला बारीक आणि गोडच आवाज लागतो ;आहे तो आमच्या लोकांकडे ,तुमच्यासारखा भसाडा आणि चार मजले जमीनदोस्त करणारा आवाज नसतो आमचा..!!...पण जंगली रेड्यांना संगीतातले काय कळणार म्हणा!!..झोपा काढा झोपा, तुम्ही चार वेळ हादडून आणि दुसर्याच्या कर्तृत्वाला नावे ठेवा ..मद्दड मेंदूच्या माणसा एक तरी गुण आहे का आमच्यासारखा तुमच्यात ??!!
?"


"गुण आहेत रे पण तुमच्यासारखे ते ओतू जाणारे अवगुण नाहीयेत; हावरट तुसडेपणा नाहीये;
 गुण म्हणे गुण?..कसले गुण रे ?..चावटपणा,स्वार्थीपणा ;आगाउपणा;एकलकोंडेपणा;भांडखोरपणा;कवडीचुंबकपणा हे गुण ?? आणि  ह्या स्वभावाचा केवढा ताठा;केवढा अभिमान तुम्हाला ?? ;अभिमान कसला गर्व म्हणूयात का ,गर्व ?..आता बोल ना ;मेणचट-पुतळ्या ??"


"अरे,डांबर-काळ्या ;काही गुण असले ना तरच ताठा येतो ;तुम्हा देशस्थांत काय गुण आहेत ते ठावूक आहे मला;आमचे गुण अवगुणच वाटणार रे तुम्हाला ;बत्थड माणसा !"


"अस का ?..अरे पांढरट रंगाच्या हिरवट माणसा आमच्या गुणांची साक्ष ईतिहास देईल...तुमचे  नुसतेच अभिमान ;आणि आगाउपणे !!..काम काही नाही!!"


"अत्र्या ;आहोत आम्ही गोरे ;कारण आम्ही तेजस्वी आहोत;स्वाभिमानी आहोत !!तुमच्यासारखे करपलेले बेढब काळपट नाहीयोत;मेंगळट आणी सुस्त ;बीनमणक्याचे अजगर नाहीयोत रे फितूर माणसा !!..आणि ईतिहासाच्या गमजा कुणाला सांगतोस रे?..आम्ही घडवलाय तो ..वाच पुस्तके जरा !!"


"वाचलीयेत रे रेम्याडोक्या ;सगळी वाचलीयेत .आणि फितूर कुणाला म्हणतोस रे निलाजर्या ??.!!..म्हणे ईतिहास घडवला .दोन चार सुधारक आणि पेशवे सोडले तर आहे काय ईतिहासात तुमचे?"


"सगळ्या चळवळी आम्ही  केल्यात अत्र्या!!..नाव घ्यायला गेलो तर तोंड अजून काळे ठिक्कर पडेल तुझे..!!"


"अरे कसल्या चळवळी रे गाडगीळ्या ?..चळवळी नाही वळवळी केल्यात नुसत्या सर्वत्र !!..म्हणे चळवळी केल्यात ..आधी साधे सरळ चाला ;कन्जूसांनो!!..मग वळवळ का चळवळ काय ते करा !!"


"कंजूस कोणाला म्हणतोस रे उधळ्या ?..धोरणी आहोत आम्ही !!धोरणी..!!बदाबदा अन्न करून फेकत नाही तुमच्यासारखे ..वाट्टेल तसे बेहिशेबी नसतो तुमच्यासारखे..!!मला सांगतोय वळवळ करा..!!अरे तुम्ही तेवढी तरी करून दाखवा ना!!..आळशी;सुस्ताड प्राणी कुठचे!!"


"अरे आम्ही केलीच ना तर डायरेक्ट क्रांती करतो;वळवळ ;चळवळ नाही ..!!आणि तुम्ही धोरणी ??
हिशेबी??..चार आणे काढताना आव लागल्यासारखे चेहरे करता तुम्ही; जेवतांना मोजून पोळ्या करणारे दीड अकली लोक तुम्ही !!;अरे आम्ही उदार आहोत दिलदार आहोत..उगाच फालतू हिशेबात आयुष्य नाही घालवत !!..आणि आमच्या शांत स्वभावाला सुस्त म्हणतोस गाडगीळ्या ?"


"तुम्ही शांत नाही ;मक्ख आहात मक्ख !!..आम्ही व्यवस्थित आहोत म्हणून सगळं मोजून मापून करतो..अत्र्या,तुमच्यासारख नाही बिनडोक वागणं आमचं..!!म्हणूनच तर ईतके तीक्ष्ण आणी विद्वान लोक जन्माला आले आमच्यात !!"


"तीक्ष्ण आणी विद्वान ??..कंजूस आणी मक्खीचूस म्हण त्यापेक्षा ..चार दोन अपवाद सोडले तर कोण आले रे महान लोक जन्माला तुमच्यात ?"


"सगळे समाज सुधारक ;स्वातंत्रवीर आणी प्रत्यक्ष पेशवे काय देशस्थ होते काय रे अत्र्या ??"


"अरे मी म्हणालो ना..नुसते वळवळ करा लेकांनो..भरीव काही काम नकोच तुम्हाला !!"


"अरे आम्ही समाज सेवा केलीये;समाजाला  जागे केलेय !!तुम्ही काय दिवे लावलेत रे ?"


"ए गाडगीळ्या;म्हणे समाजाला जागे केलेय!!..आधी त्याला झोपवले तुम्हीच ना ?"


"अस्स?..पण निदान जागे तरी केले;तुम्ही काय दिवे लावले ब्राह्मण असून ते सांग !"


"अरे आम्ही असे दिवे लावलेत कि त्याचा प्रकाश उधार घेऊन अजून जगताय तुम्ही .."


"असे कोण महान लोक जन्माल घातले रे तुम्ही"


"सगळे संत बघ ;मक्खीचूस माणसा !!..एकजात देशस्थ होते !!..संत रे संत..!! वळवळे नाहीतर चळवळे नाहीत ..डायरेक्ट संतच !!..ही लेव्हल आहे आपली..डायरेक्ट संत.!!.आता बोल की कोकण्या ?? ""


"अरे हवेतच  रहा तुम्ही ,हवेतच !!संत असतात चार आणि त्यांची नावे काढत स्वताची पाठ थोपटा घाट्यान्नो!"




"मग सुधारक आणि स्वातंत्र्यवीर काय लाखात मोजावे ईतके होते काय रे कोक्या ??"


"अरे माठ्या; आम्ही संस्कारी आहोत ;तुमच्यासारखे गबाळे आणी बेशिस्त नाही"


"कोणाचे संस्कार रे कोबरटा?..कसले संस्कार ?..सासू सासर्यांना बाहेरची पायरी दाखवण्याचे आणी जावयांना घरजावई करण्याचे ??;कि चीक्कुपणे आणी स्वार्थीपणे स्वताच्या पोळीवर तेवढे तूप ओतून घेण्याचे ??"


"ए वाह्यात माणसा,वाट्टेल ते आरोप नको करूस,आम्ही शिस्तबद्ध वागतो न तेच सलतंय तुम्हाला ..!!सगळ्या गोष्टीत घोळ घातले की मगच बरे वाटते ना तुम्हाला ;वाट्टेल तसे खायचे ;झोप काढायच्या ;मंदपणे जगायचे आणी फुकटचे सल्ले द्यायचे येवढेच करा तुम्ही !..सुधारणार नाही कधी तुम्ही देशस्थ माणसे !!"
  
"जे मनाने आधीच सुधारलेत त्यांना तुम्ही अजून काय सुधारणार रे ?..स्वताकडे बघा आधी !!"


"अच्छा!!..तुम्ही मनाने सुधारलेले??..अरे मनाने बोथट आहात बोथट!!कुशाग्र बुद्धी नाही तुमची !,शिका आमच्याकडून काहीतरी "


"तुमच्याकडून काय शिकणार ?.लुच्चेपणा??. तुम्हीच साधेपणा शिका आमच्याकडून !!"


"ईतकी वाईट वेळ अजून आली नाहीये चित्पावनांवर ;कि तुमच्याकडून शिकावे ..!!"


"मग देशस्थांची सुद्धा बुद्धी अजून ईतकी भ्रष्ट नाही झालीये कि तुमच्याकडून सल्ले घ्यावेत !!"


"एक मिनिट अत्रे ;आपण असेच भांडत राहिलो तर निकाल लागणार कसा ?"


"हो रे गाडगीळ ;थांब ,कोणाला तरी विचारुयात..तो बघ तिथे एक माणूस आहे मघासपासून ऐकतोय वाटत आपला वाद..त्यालाच विचारुयात .."


"चालेल ;मला तरी तो माणूस कोणी मोठा आणी विद्वान वाटतोय ;चल ,विचारू त्याला "



तेवढ्यात तो माणूस स्वतच जवळ येतो ..आणि दोघांनी काही विचारण्याआधीच म्हणतो ...

""तुमच्या दोघांत तोच जिंकलाय जो सगळ्यात जास्त मूर्ख आहे..!!आणि माझ्या मते तुम्ही दोघेही जिंकलेले आहात..अर्थात महामूर्ख देखील आहात !!;विनाकारण वितंडवाद करणारे संतही नसतात आणि सुधारकदेखील..आणि हो..असेच भांडत राहिलात तर दोघेही सुधारणार तर नाहीच पण अजूनच बीघडाल !..एकेमकांना समजून घेतलत तर शहाणे राहाल नाहीतर अज्ञानातच जगाल आणि तसेच मराल.!! 
लक्षात ठेवा :-एकमेकांशी संवाद करून दोष समजून घेणे आणि ते सुधारणे हाच खरा सहकार !!..
         आणि नुसतेच एकमेकांचे दोष दाखवणे आणि टीका करणे म्हणजे  संपूर्ण अनाचार !!..


काय करायचं ते तुम्हीच ठरवा!!!...................




-----विशेष सूचना:---हा प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिलेला असून केवळ काही शब्द;पात्रांची नावे    आणि संवाद वगळता सुमारे ८० ते ८५% जसाच्या तसा लिहिलेला आहे..!!हे लिहिण्यामध्ये काही ठिकाणी अतिशयोक्ती असली तरी त्यातला काल्पनिक भाग अत्यल्प आहे..ब्राह्मण वर्णाने एकसंघ राहावे ह्या मताचा मी असल्याने ..सर्व ब्राह्मण मी समान दृष्टीने पाहतो...मला भेद समजतात पण मान्य होत नाहीत ;ते भेद मोडून ही ब्राह्मशक्ती एक व्हावी अशीच ईच्छा माझी सदैव असते व राहील सुद्धा  !!...त्यामुळे अर्थातच हे संवाद  लेखन कोणाही कोकणस्थ अथवा देशस्थ मनुष्यास दुखावण्यासाठी हे लिहिलेले नसून;उलट अशा निष्कारण कटुते पासून सार्यांनीच बोध घ्यावा व असे प्रकार घडू नयेत म्हणून हा लेखन प्रपंच आहे !!तरीही चुकून कुणास तसे वाटून वाईट वाटले असल्यास मी त्यांची क्षमा मागतो  !!...


..................लेखन ------ ----  हर्षल !!

..................देशस्थ आणि कोकणस्थ ...भाग २...! [ स्वानुभव ].........

प्रसंग ४:---
स्थळ :-ज्योतिषी अभ्यंकरांचे घर ; पुणे
वेळ:-सकाळी ११ चा सुमार ..


"आलास का रे ?..देशपांडे न तू?"

"होय ..पाया पडतो !!"

"शुभमस्तु !!..बैस !!.. हा तुझा मित्र शैलेंद्र म्हणजे नातू हो माझा!!  त्याचा काल फोन आला होता ;म्हणत होता देशपांडे म्हणून मित्र आहे त्याला भेटायचं तुम्हाला ..!!..हर्षल नाव ना तुझे ??..छान ..पत्रिकेतील हर्षल ग्रहासारखाच अकस्मात आलास ..असो..काय करतोस सध्या??"

"मी डोंबिवलीस असतो....आताच तृतीय वर्षात गेलो आहे अभियांत्रिकीच्या! civil engineering 
शैलेन्द्र आणि मी दोन वर्षापूर्वी iit च्या क्लास मध्ये भेटलो होतो..तो वर्गमित्र नसला तरी स्वभावाने चांगला असल्याने फोनवरून ओळख अद्याप राहिलीये आमची..आता सहा महिन्यांपूर्वी भेटला तो मला अचानक रेल्वे मध्ये ..आणि बोलता बोलता तुमच्याबद्दल सांगितले..ते ऐकून आपल्याला भेटायला यावेसे वाटले..काल मामाकडे येणार होतोच पुण्याला म्हणून शैलेन्द्र ला विचारून पत्ता घेतला ..१० दिवस मुक्काम आहे पुण्यात ..तुम्हाला थोडा त्रास दिला या वयात म्हणून क्षमा करा परंतु तुमच्यासारखे ज्ञानी आता भेटणार नाहीत आणि माझ्यासारख्याला बर्याच गोष्टी तुमच्यासारख्यानशिवाय समजावणारे तपोवृद्ध लाभणार नाहीत म्हणूनच वेळ न दवडता आलोय...अशा आशेने कि आपण काही ज्ञान देऊ शकाल मला ..!!"

"[हसून]..अगदी मोठ्या माणसांसारखा बोलतोस रे..!!.जेवण झालंय का?..नाहीतर जेवूनच जा ..आणि कसलं ज्ञान हवंय तुला ?..ज्योतीषाच??..कि अजून काही ??"

"नाही गुरुजी ; एकंदरच ब्राह्मण ईतिहास आणि संपूर्ण हिंदू समाजाचा आणि मानवी समाजाचा ईतिहास यावर मी काही स्वतंत्र आणि मूलभूत विश्लेषण केलंय..पुराव्यांसहीत ..परंतु प्रचलीत ईतिहास फार उथळ ;खोटारडा आणि सवंग वाटतो त्यापुढे ..वेद ,पुराणे आणि अनेक मूलभूत ग्रंथ वाचल्यावर मी भारतीय प्रचलीत ईतिहास पाहतो तेंव्हा आपल्याच माणसांची कीव येते..त्यासंबंधी बोलायचय आपल्याशी ..शिवाय ज्योतिषाचे काही नियम आणि योग यांवर सुद्धा..!!"

"अरे तू इंजिनियर होणारेस का प्राच्य-विद्या -पंडीत ?..आणि तू म्हणतोस तितका सोपा विषय नाहीये ईतिहास !..आणि ज्योतीषाच म्हणशील तर हा एक अथांग सागर आहे बाळा..!!शिवाय तुझे ज्ञान किती आहे हे अजून तपासावे लागेल !!"

"परीक्षा घ्या माझी ;त्याचसाठी आलोय इथे .!!.आणि विद्यालयीन अभ्यास म्हणाल तर त्यापेक्षा जास्त आनंद आणि समाधान मला ह्या क्षेत्रात मिळेल असे वाटते..!!नुसता इंजिनिअर होऊन कोरडा माणूस बनण्यापेक्षा काही अधिक उत्तम करावे आणि अधिक धर्म जाणावा असे वाटते..तुम्ही सांगाल मला माझ्या प्रश्नाची उत्तरे?..अर्थात तुम्हाला माझ्या पात्रतेबद्दल खात्री झाल्यावरच..!"

"सांगेन बाळा !!..ठीक आहे..एक मिनिट हां!!..हं ही घे एक पत्रिका ;आणि सांग काय सांगशील यावर ??.."
[अर्ध्या तासाने ]

"मी लिहिले आहे गुरुजी ;माझे या पत्रीकेबद्दल्चे परीक्षण ..बघा !!

[ते वाचतात आणि वाचून झाल्यावर ]

"इतक्या लहान वयात कुठे शिकलास रे बाळा??.उत्तम . .पण राहूचा कुयोग नक्की होईल असे वाटते?
पुढे काय लिहिलयस ?..हो बरोबर.. कारण चंद्र नवमेश आहे आणि सूर्य पराक्रम स्थानात ...छान !!अंश योग येतात वाटत ??..असा विद्यार्थी फार पूर्वी एक होता ..तुझ्यासारखा ४० वर्षांने दुसरा बघतोय ..!..अजून बरंच शिकशील ..उपासना करतोस ना ??..छान ..!!"

"मग सांगाल मला ..माझी उत्तरे ..??"


"अवश्य !..काय हवंय विचार..!!..ईकडे बघ ती ट्रंक दिसतीये ना? ती काढ त्यात जुनी पुस्तके आहेत ..आता दुर्मिळ आहेत ती ..पण झेरोक्स मारून घे हवे ते पुस्तक..बरीच उत्तरे त्यात मिळतील "

"आणि गुरुजी अजून एक ;सध्या काही कोकणस्थ ब्राह्मणांकडे एक सीडी असते ;मी पाहिलीये ती! !..त्यात ईतिहास आहे त्यांचा असे ते म्हणतात ...पण तो पर्शुरामापासून चालू झालेला दाखवलाय शिवाय गोत्रांचे ;प्रवरांचे आणी आपल्या वेदांशी साम्य दाखवणारे उल्लेख अत्यल्प आहेत त्यात...केवळ ३५०० वर्षाचा ईतिहास आपला आहे असे अत्यंत धादांत खोटे प्रचार सुरु आहेत ..आणि अज्ञानामुळे बरेच लोक ते खरे मानतायेत..!!..आपल ईतिहास किती जगड्व्याळ आहे हे कसे समजेल यांना ?..भेदांच्या भिंती कशा कोसळतील ब्राह्मण समाजातल्या ??..हा भारतीय समाज कसा स्वताचा एक धर्म आणि एक तत्त्व समजेल ?..आणि कधी?.""

"आपला ईतिहास फार प्राचीन आहे,देशस्थ ;कोकणस्थ आणि तत्सम भेद अर्वाचीन आहेत..समस्त भारतीय ब्राह्मण ;क्षत्रिय आदी केवळ चार वर्णांतच विभागले होते..कालांतराने आणि कलियुगाच्या आगमनाने चार वर्णांच्या चार सहस्त्र जाती झाल्या..आणि जातीच स्वताला मूलभूत समजू लागल्या..भेद झाले;धर्म लयास गेला;ब्राह्मण भ्रष्ट झाले;समाज अज्ञानमय झाला..यंत्र प्रगती विवेक देऊ शकत नाही.तुला हेच म्हणायचेय ना??....".खूप बोलता येईल ..पण उद्या ये !!..आणि आत्ता जेवूनच जा हो.!!.कोकणस्थ आडनाव असले  तरी खरा ब्राह्मण आहे [हसतात ]..आमच्या पुण्यातील काही ईतर नुसत्याच नामधारी चित्पावन ब्राह्मणांसारखा नाहीये हो मी ..!!.

"[उतावीळपणे] अगदी हेच गुरुजी हेच .! आणि अजून बरेच काही !!.आणि [हसून ]तुम्हाला आजच्या रूढ व्याख्येप्रमाणे कोकणस्थ कोण म्हणेल ?..हो पण सत्त्वशील ब्राह्मणाचे उदार हृदय नक्की आहे इतके मात्र खरे...!!

"अरे देशस्थ आणि कोकणस्थ काय किंवा ईतर पोटजाती काय ,आंधळे झालेत सगळे,बहुतेक तर नुसते गोत्राने आणि आडनावाने ब्राह्मण उरलेत,अनाचार आणि स्वार्थ हे ब्राह्मणाचे दोन शत्रू असतात..त्यांना शरण गेले कि अशी भयंकर स्थिती उत्पन्न होणारच..आणि अजून कलियुगाचा बराच शेष आहे,अजून बरेच दुर्धर प्रसंग येणारेत समाजांवर..मानवतेवर ..!!.अनेक देशस्थ काय किंवा चित्पावन काय किंवा अन्य कोणी ब्राह्मण काय सगळेच आत्मविद्येपासून दूर होत गेलेत..आणि सदाचारापासून फारकत घेतायेत !!..आजकाल तर कुणाला ब्राह्मण म्हणावे असा प्रश्न पडेल !!..ब्राह्मणांनी धर्म काळाच्या ओघात फक्त पोथ्यांद्वारे ;पाठांतराद्वारे जिवंत ठेवला ईतकेच पुण्यकर्म घडले त्यांचे हातून..सुदैवाने..!!..पण काल-पुरुषाचा प्रभाव त्यांवरही पडलाय आणि म्हणूनच ,तेही फक्त जाती ;पोटजाती आणि ईतर संकोच केलेल्या रूढी यांचे भक्ष्य ठरलेत !..उदाहरण म्हणजे,कोकणस्थ कंजूस;धोरणी;आणि हुशार किंवा चलाख बुद्धीचे असा एक समज आहे ;त्यात सत्य ईतकेच कि कालमानाने त्यांच्या पिढ्या विशिष्ठ संस्कार आणि विचार यांच्या चक्रात राहिल्या ;परंतु सुज्ञ ब्राह्मणाने असा विचार करावा कि परंपरा ;रूढी कालमानाने उत्पन्न होतात आणि धर्म सनातन असतो..!! ज्ञानी 'ब्राह्मण' म्हणून श्रेष्ठ होणे महत्वाचे कि लहान सहान गुण-अवगुण यांवरच स्वताचे विशिष्ठ ब्राह्मण्य मिरवायचे हे ज्याला समजेल तोच ब्राह्मण अशा पोट भेदांच्या पार जाऊ शकेल !!आपल्या  विविध ब्राह्मण पोट-जातीमध्ये जो भेद आहे तो 'ब्राह्मणत्वाचा'नाहीच ..भेद असलाच तर तो केवळ प्रादेशिक वैशिष्ट्यांचा आणि तत्सम काही लहान सहन परंपरांचा ..आणि सध्या लोक "ह्या" वैशीष्ट्यालाच ब्राह्मणत्व समजू लागलेत ..हेच अत्यंत घोर दुर्दैव आहे !हा अखंड ब्राह्मण समाज आता केवळ पूर्वपुण्याईवर ;आनुवंशिक गुणांवर सध्या तरी टिकून आहे..पण ही पुण्याई ;हे भाषावैभव ;हे उच्चारज्ञान;ही वाणी शुद्धता;गोत्र-प्रवरादी ज्ञान हे सुयोग्य विवेकाशीवाय आणि शुद्ध कर्मांशीवाय टिकून देखील राहणार नाही..पुढच्या पिढ्या तर कसलाच अर्थ समजू शकणार नाहीत ..!!..लक्षात ठेव..जो मनुष्य ज्ञान ;सत्कर्मे आणि निस्वार्थ बुद्धीने आयुष्याचा निर्वाह करतो ;ज्याचे आचरण पवित्र्याच्या ध्यासातून सतत अधिकाधिक उन्नत होत जाते असाच मनुष्य म्हणजे खरा ब्राह्मण होय.!!.नाहीतर बाकीचे सगळे म्हणजे समर्थ रामदासांनी सांगीतलय न तसे .."जन्मा येऊन; जननी वायाची कष्टविली"..नुसते नावाचे ब्राह्मण !!..'ब्राह्मणत्व' हे आकलन व्हायला हवे !!स्वजातीचा वृथा अभिमान संकुचित करतो;उन्नत नाही!!..आजकाल हेच ब्राह्मणांना सांगायची वेळ आलीये ह्याहून दुर्दैव कोणते??.....असो!!
  ..फार जुने 'जाणते' आणि 'नेणते' लोक पाहिलेत मी बाळ;आता ८५ वय चाललंय सध्या..शरीर साथ देत नाहीये..पण तुझ्यासारखे तरुण बघितले कि अजून माझेच सिद्धांत मनात पुन्हा दृढ होतात;आशा वाटते;निद्रिस्त स्वप्ने आणि शुद्ध सद्गुण अजूनही मेलेले नाहीत यावर पुनःश्च विश्वास बसतो..!!थोडा उशीरा भेटलास पण ठीकाय, हरकत नाही..कदाचित ह्या आठवड्यानंतर परत भेटणारही नाहीस. नियती जरा खेळ करतच असते.ईश्वराशिवाय दुसरा त्राता वाटू नये म्हणजे ही नियती सुसह्य होते..असो..चला भोजन करून घेऊ..भरपूर खा हो बाळ,संकोच ठेवू नकोस,..आमच्या हिने पाने मांडली असतील ..चला.!! "    

[जेवण करून अभ्यंकर श्री आणि सौं च्या वृद्ध पायावर डोके ठेवून पुस्तके घेऊन निघतो...पुढचे चार दिवस अखंड चालणारे ज्ञान सत्र डोळ्यासमोर नाचत असते..मनात प्रकाश भरून जातो..आपण एकटे नाही आणि आपले विचार ज्ञानी मनुष्ये मान्य करतात हा विश्वास आणि दिलासा मनात भरून मी देवाचे आणि अशी ऋषीतुल्य माणसे मिळवून देणार्या माझ्या नशीबाचे आभार मानतो.!!..पुढचे चार सोनेरी दिवस स्वप्नासारखे डोळ्यात तरळत ..मी अभ्यंकर गुरुजीच्या जुन्या वाड्याच्या बाहेर येतो...प्रसन्न मनाने !!] 

...मी त्या आठवड्यात चार वेळा त्यांकडे गेलो....त्यांचे ज्ञान पहिले;निस्वार्थी वृत्ती पहिली!अनेक विषयांवर मनसोक्त चर्चा केली ;गोड-धोडाचे भरपूर जेवण केले ;अत्यंत क्लिष्ट विषय हाताळले ; उर फुटेपर्यंत शिकलो असे म्हंटले तरी अतिशयोक्ती होणार नाही .. ..तृप्त आणि भरलेल्या मनाने त्यांना अनेकवार नमस्कार केला..!!हे ऋण अनिर्वाच्य आहे..असे भाग्य क्वचित लाभते !!

 ..शेवटच्या दिवशी त्यांची सर्व पुस्तके परत केली..त्यातले एक दुर्मिळ पुस्तक  मला त्यांनी भेट दिले.....
.......आणि, मी त्यांच्या पाया पडून निघत असतानाच,आपला कंप पावणारा उजवा हात त्यांनी माझ्या तळहातावर ठेवला ..आणि दुसरा हात आधारासाठी माझ्या खांद्यावर ठेवला!!..आपल्या कापत असलेल्या उजव्या हाताने माझा उजवा हात धरून ठेवत मला म्हणाले "निघालास ना;आता भेट बहुदा नाही ..वर्षभर तरी पुण्यात येणार नाहीयेस तू..त्यानंतर येऊन उपयोगही  नाहीये..!!"मंद हास्य करीत ते शांतपणे म्हणाले .........आणि माझ्या डोक्यात लख्खकन वीज चमकून गेली !!...मला धक्का बसला ;मी विसरलो होतो ;ते एक महान ज्योतिषी सुद्धा होते..आणि महान ज्योतिषी यमाचे संकेत चांगलेच जाणतात..स्वतःबद्दलचे देखील!..व्यवस्थित समजले मला!!

कापर्या आवाजात मी म्हणालो "कधी साधारण ?"....

ते म्हणाले "लवकरच रे बाळा!!तिथी विचारू नकोस !!ती मात्र सांगणार नाही; तसेही तुला सांगणार नव्हतो ;आमच्या "ही"ला नाही माहित ;मुलाला;सुनेला आणि नातवाला देखील नाही माहीत..पण तुला सांगावेसे वाटले म्हणून सांगितले..हे ज्ञान तुझ्याजवळच ठेव..!!अभ्यास उत्तम कर..आणि चिंता करू नकोस..सत्य स्वीकारायला अवघड असले तरी ते स्वीकारल्यानंतरच ज्ञान प्राप्त होते..तुला समजेल म्हणून सांगितेले.!!"...

" अहो पण ,असे अचानक ?तुमची पत्रिका बघीतलीये मी; ईतका लगेच योग आहे वियोगाचा ते नाही समजले हो !!खरंच"..मी जड मनाने ,अस्वस्थ होत विचारले..

"अजून बरंच शिकायचंय बाळा तुला ज्योतिष !!..वेळ आहे ते सगळ समजायला ! आणि योग्य वेळी समजेल सुद्धा तुला..मी सांगतोय ते सत्य आहे इतके खरे ..एक गोष्ट ध्यानात ठेव,स्वार्थ हा खरा मृत्यू ;खरा नाश.. देहाचा अंत क्षणिक असतो,नियतीचा साधा नियम आहे तो ,त्याला घाबरून जाऊ नये.."..ते अगदी प्रेमळपणे म्हणाले .

"मी खरंच सांगतो ;काय बोलावे मला समजत नाहीये..पण मला अजिबात आवडलेले नाहीये हे तुमचे सत्य "...माझा कंठ भरून आला होता हे वाक्य बोलताना !!...शब्द सुचत नव्हते!!

माझा तळहात त्यांनी घट्ट धरला..माझ्या खांद्यावर थोपटले..आणि माझ्या खिन्न आणि विभ्रमीत झालेल्या मुद्रेकडे पाहून हलकेच हसले..त्या हसण्यात एक गांभीर्य होते;हळवेपणा होता...त्यांचे डोळे भरून आले होते...प्रेमाने आणि मायेने ..अगदी एखाद्या प्रेमळ आजोबांसारखे!!...मी न बोलता त्यांचा निरोप घेतला..!!

सहा महिन्यांनी त्यांचे निधन झाले..मला जावेसे वाटत असून मी गेलो नाही..पाय वळले नाहीत तिकडे !!..शैलेंद्र ने मध्यंतरी पुण्याच्या चित्पावन सभेचा अंक मला दाखवला..त्यात आजोबांची बातमी बघ
म्हणून सांगितले .मी वाचू लागलो ..
"चित्पावन ब्राह्मण समाजातील एक विद्वान ज्योतिषी श्री.अभ्यंकर यांचे आज निधन झाले..ते  सुपरिचित आणि विद्वान ज्योतिषी होते..परंतु प्रसिद्धीची कास धरली नाही...".ईत्यादी..आणि शेवटी वाक्य होते "...ब्राह्मणांमध्ये भूषणावह असलेल्या चित्पावन समाजात असे विद्वान निर्माण झाले हे या समाजाचे सुदैव ,..त्यांच्या मृत्यूने चित्पावन समाजाची मोठीच हानी झालेली आहे.." ..

मी शेवटच्या ओळीकडे विखारी नजरेने थंडपणे  निरखून पहिले  "... त्यांच्या मृत्यूने चित्पावन समाजाची मोठीच हानी झालेली आहे.."...हे वाक्य म्हणजे ह्या देवतुल्य माणसाची उंची शून्यवत करणारे वाक्य होते...!!..लोकांना थोर पुरुष समजत नाहीतच लवकर !!.मी पुन्हा वाक्य वाचले; माझा कप्पा उघडून मला हवी ती वस्तू मिळवली  एक जाड स्केच पेन !!
.............क्षणाचाही विचार न करता  मी ,त्या वाक्यातल्या  'चित्पावन' शब्दावर जाड स्केच पेनाने काळी गडद मोठ्ठी फुली मारली ...आणि तिथेच  त्याऐवजी  "समस्त ब्राह्मण"असे दोन  शब्द घालून तेच वाक्य पुन्हा वाचले ... "" त्यांच्या मृत्यूने 'समस्त ब्राह्मण 'समाजाची मोठीच हानी झालेली आहे.." आणी ,या वाक्यापुढे मनातच स्वताचे एक वाक्य टाकले ...."ही हानी किती भयंकर आहे हे;सध्याच्या विस्कळीत ;विभ्रमीत आणि स्वजातींचा अहंकार आणि उन्माद चढल्याने अज्ञानी झालेल्या संपूर्ण ब्राह्मण समाजाला इतक्या लवकर समजेल असेही वाटत नाही...!!"

........खरच सांगतो .....
""  असे "शुद्ध" आणि "खरे" ब्राह्मण अगदीच दुर्मिळ असतात;अगदी प्रत्यक्ष देवाच्या दर्शनाइतकेच .दुर्लभ!..  आणि मी त्यातल्या एकाचे अपरोक्ष  दर्शन घेतले हेच पुष्कळ आहे ..!!"" ...


.................................................लेखन:--- हर्षल